पालघर : (Palghar Unseasonal Rain) पालघर जिल्ह्यामधील वाडा, मोखाडा या तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांचे, तसेच आंबा, चिकू या फळबागांसह इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून वीजपुरवठा देखील खंडीत झाला होता. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावल्याने शेतकरी चिंतेत असून सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहे. याबाबत प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत.
कोसबाड येथील हवामान खात्याने ३१ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार, ४ एप्रिल रोजी वाडा, मोखाडा या तालुक्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला होता.तर अनेक ठिकाणी गारपीट झाली होती. या अवकाळी पावसामुळे येथील नागरिक व शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती. वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला होता. आंबा, चिकूच्या फळबागा, इतर भाजीपाला यांसह हरभरा, तुर, वाल, भुईमूग, यांसारखी कडधान्ये पिके काढणीसाठी तयार झाली होती. या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होऊन नुकसान झाले आहे.
प्रशासनाने याबाबत पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश कृषि व महसूल विभाग कार्यालयाला दिले होते, त्यानुसार प्राथमिक अहवाल महसूल प्रशासनाकडे प्राप्त झाला असून अंतिम अहवाल मात्र प्रतिक्षेत आहे. यानंतरच निश्चित नुकसान किती प्रमाणात झाले आहे हे ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\