एकीकडे देशक्त भारतीय नागरिक पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याचा समाजमाध्यमांसह रस्त्यावर पाकिस्तानचे झेंडे चिकटवून निषेध करत असताना, काही मुस्लीम नागरिकांकडून मात्र या हल्ल्याचे, पाकिस्तानचे आणि एकप्रकारे दहशतवादाच्या समर्थनाचेच प्रकार घडताना दिसतात. अशा नागरिकांचा निषेध करावा तितका कमीच!
जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे 26 हिंदू नागरिकांना लक्ष्य करून त्यांना ठार मारण्याच्या घटनेचा भारतात आणि जगातील विविध देशांकडून निषेध केला जात असताना, आपल्याच देशातील कर्नाटक राज्यामधील काही मुस्लीम महिलांना एकदम पाकिस्तानचा पुळका आला! कर्नाटक राज्यातील कलबुर्गी या शहरात पहलगाम घटनेच्या निषेधार्थ ‘बजरंग दला’ने रस्त्यांवर पाकिस्तानचे ध्वज चिकटवले होते. तसेच, त्या शहरातील स्वच्छतागृहातही पाकिस्तानचे ध्वज निषेध व्यक्त करण्यासाठी लावले होते. पण, पाकिस्तानचे प्रेम असलेल्या दोन बुरखाधारी मुस्लीम महिलांनी शहरात मोक्याच्या ठिकाणी लावलेले पाकिस्तानचे राष्ट्रध्वज काढून टाकले. उलट त्या महिलांनीही पाकिस्तानचा निषेध करण्याच्या उपक्रमात सहभागी व्हायला हवे होते. पण, आपल्या देशातील अनेक मुस्लिमांना पाकिस्तानचे प्रेम वाटत असल्याचे या उदाहरणावरून दिसून आले.
कलबुर्गीमधील जगत सर्कल आणि अन्य महत्त्वाच्या मार्गांवर पाकिस्तानचे ध्वज रस्त्यांवर चिकटवण्यात आले होते. जनतेने पाकिस्तानच्या भ्याड कृत्याचा निषेध करावा आणि पाकिस्तावरचा आपला संताप व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानचे ध्वज रस्त्यांच्या मधोमध चिकटवले होते. पण, या दोन मुस्लीम बुरखाधारी महिलांनी पाकिस्तानचे ध्वज काढण्याची जी कृती केली, त्याची समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटली. दोन बुरखाधारी मुस्लीम महिलांची ही कृती पाकिस्तानला पाठिंबा देणारी अशीच होती. समाजमाध्यमांवर या घटनेच्या फिती व्हायरल होताच, तीव्र प्रतिक्रिया उमटली. पाकिस्तानच्या भ्याड कृत्याचा निषेध करण्याऐवजी मुस्लीम महिला पाकिस्तानची बाजू घेतात आणि त्याबद्दल संताप व्यक्त करण्यापलीकडे आमच्या हातून काहीच घडत नाही. पोलिसांनी त्या बुरखाधारी मुस्लीम महिलांवर कारवाई करण्याऐवजी ‘बजरंग दला’च्या सहा कार्यकर्त्यांना शहरात पाकिस्तानचे झेंडे लावल्याबद्दल ताब्यात घेतले.
या संदर्भात पोलीस आयुक्त डॉ. शरणप्पा यांनी ‘बजरंग दला’च्या कार्यकर्त्यांवर ठपका ठेवला. प्रत्येक नागरिकाला निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण, ‘बजरंग दला’ने योग्य ती परवानगी घेतली नव्हती, असे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. मग त्या मुस्लीम महिलांनी कोणत्या अधिकारात पाकिस्तानचे ध्वज हलविण्याचा उद्योग केला? शहरातील वातावरण चिघळू नये, म्हणून ‘बजरंग दला’च्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. ‘बजरंग दला’च्या कार्यकर्त्यांवर कारवाई आणि दोन मुस्लीम महिलांवर काहीच कारवाई नाही, याबद्दल जनतेने तीव्र संताप व्यक्त केला. पहलगामची घटना म्हणजे एकप्रकारे देशाच्या सार्वभौमत्वावर आणि सुरक्षेवर घातलेला घाला होता. देशातील सर्वांनी एकमुखाने या घटनेचा निषेध करायला हवा होता. पण, आपल्याच देशातील काही मुस्लीम समाजास अजूनही पाकिस्तानचा पुळका येतो. ही देशविरोधी कीड मुळापासून उखडून फेकण्याची आवश्यकता आहे.
भारतावर अणुहल्ला करण्याची धमकी!
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये 26 हिंदू पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करण्याच्या घटनेनंतर त्या घटनेबद्दल पाकिस्तानला ना खंत ना खेद असल्याचे दिसून आले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध विविध पावले उचलली. त्यामध्ये पाकिस्तानसमवेत केलेला सिंधू जलवाटप करार स्थगित ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय भारताने घेतला. या निर्णयामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले असून, हा करार स्थगित ठेवण्याची कृती म्हणजे पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. भारताने घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तानमधील नेत्यांचा जळफळाट होणे स्वाभाविकच. पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ)चे एक वरिष्ठ नेते हनीफ अब्बासी यांनी तर पाकिस्तानचे पाणी तोडण्याची कृती लक्षात घेता, भारतावर अणुहल्ला करण्याची वेळ आली आहे, अशी धमकी दिली.
हनीफ अब्बासी यांनी पाकिस्तानची 130 अण्वस्त्रे भारताच्या दिशेने रोखण्यात आली असल्याचे म्हटले आहे. ‘गझनवी’, ‘घोरी’ आणि ‘शाहीन’ यांसारखी क्षेपणास्त्रे सज्ज असल्याचे अब्बासी यांनी म्हटले आहे. अब्बासी हा नेता पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ)चे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी संबंधित आहे. अमली पदार्थांच्या तस्करीबद्दल हनीफ अब्बासी याला 2018 साली दोषी ठरविण्यात आले होते. पहलगाम हल्ला म्हणजे ‘भारतीय गुप्तचर संघटने’चे अपयश असल्याची टीका या अब्बासीने केली. अब्बासी याने अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी दिली असली, तरी असे हल्ले करणे वाटते तितके सोपे नाही. पाकिस्तानने भारताच्या दिशेने अण्वस्त्रे रोखली असली, तरी भारत काही हातावर हात ठेेवून
गप्प बसलेला नाही, हे पाकिस्तानच्या नेत्यांच्या कधी लक्षात येणार? युक्रेन-रशिया युद्ध सुरू आहे, इस्रायल-हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. पण, यापैकी कोणीही अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी दिलेली नाही. अणुयुद्धाचे काय परिणाम होऊ शकतात, याची या देशांना कल्पना आहे, तशी पाकिस्तानलाही कल्पना आहे. फक्त भारतास धमकाविण्यासाठी असल्या धमक्या पाकिस्तान देत आहे. पाकिस्तानमधील सत्ताधीश जी वस्तुस्थिती आहे, ती मान्य करून भारताविरुद्ध कुरापती काढण्याचे उद्योग संपुष्टात आणतील का? हा कळीचा मुद्दा आहे. पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांना भारत धूप घालणार नाही, हे पाकिस्तानच्या नेतृत्वाने पक्के लक्षात ठेवायला हवे!
‘आम्ही भारताच्या मागे खंबीरपणे उभे’
पहलगाममधील भीषण हल्ल्यानंतर अनेक देशांनी भारताच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी पहलगाममधील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेच्या मागे आम्ही उभे आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी अशाच भावना व्यक्त केल्या आहेत. पहलगाम येथे हिंदू समाजास लक्ष्य करून इस्लामी दहशतवाद्यांनी 26 जणांची नृशंस हत्या केली. ही घटना लक्षात घेऊन आम्ही भारताच्या मागे ठामपणे उभे आहोत. दरम्यान, एका पाकिस्तानी पत्रकाराने या हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्याकडे अमेरिकी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते टमी ब्रूस यांचे लक्ष वेधले असता, अमेरिकेच्या प्रवक्त्याने त्यांचा प्रश्न उडवून लावला. दरम्यान तुर्कस्तानसारखा देश मात्र भारताने केलेली मदत विसरून पाकिस्तानला लष्करी सामग्रीचा पुरवठा करीत आहे. तुर्कस्तानमध्ये 2023 साली झालेल्या भूकंपाच्या वेळी त्या देशाला भारताने मोठ्या प्रमाणात मदत केली होती. पण, त्या मदतीचा तुर्कस्तानला विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. तुर्कस्तानची ही भूमिका लक्षात घेऊन तुर्कीश पर्यटन, विमानसेवा, उत्पादने यांवर बहिष्कार टाकण्यात यावा, अशी मागणी संतप्त भारतीयांकडून करण्यात येत आहे.
डाव्यांच्या गढीत ‘अभाविप’चा झेंडा!
नवी दिल्लीतील ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठ’ हा डाव्या संघटनांचा गढ मानला जात असे. पण, ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ने त्या विद्यापीठात नुकत्याच झालेल्या विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळविले आहे. एका अर्थाने या निवडणुकीत विद्यार्थी परिषदेने इतिहास घडविला आहे. ‘अभाविप’ने या निवडणुकीत संयुक्त सचिवपद आपल्या ताब्यात घेतले आहे, तर काऊन्सिलरपदासाठी झालेल्या निवडणुकीत 42 पैकी 24 जागा जिंकून डाव्यांच्या गढीला हादरा दिला आहे. संयुक्त सचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत ‘अभाविप’चे वैभव मीणा विजयी झाले. तसेच आतापर्यंत डाव्या संघटनांची मक्तेदारी असलेल्या या विद्यापीठातील काऊन्सिलरपदाच्या 42 पैकी 24 जागा जिंकल्या आहेत. या निकालामुळे डाव्या विद्यार्थी संघटनांचा गढ मनाला जात असलेला ‘जेएनयु’मध्ये ‘अभाविप’चा भगवा फडकला आहे. ‘स्कूल ऑफ सोशल सायन्सेस’ हा ‘जेएनयु’मध्ये डाव्यांचा बालेकिल्ला मनाला जात असे. पण, गेल्या 25 वर्षांमध्ये प्रथमच ‘अभाविप’ने त्या शाखेत दोन जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत विद्यार्थी परिषदेने काही जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. या विद्यापीठात डाव्या संघटनांनी राष्ट्रवादी विचारसरणीची गळचेपी केली होती. हा विजय म्हणजे डाव्यांना दिलेले सडेतोड उत्तर आहे, असे संयुक्त सचिवपदावर नव्याने निवडून आलेले वैभव मीणा यांनी म्हटले आहे.