"आता पाकिस्तानवर अशी कारवाई करा की,..."; पहलगाम हल्ल्यानंतर माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया
29-Apr-2025
Total Views | 28
मुंबई : आता बालाकोट नाही तर पाकिस्तानवर अशी कारवाई करा की, असे हल्ले पुन्हा कधीही होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी दिली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी यावर भाष्य केले.
फारुख अब्दुल्ला म्हणाले की, "आपल्या शेजारी पाकिस्तानला अजूनही हे समजलेले नाही की, आपण मानवतेविरुद्ध गुन्हा केला आहे, याचे आम्हाला खूप दुःख आहे. अशा कृतींमुळे आपण पाकिस्तानात जाऊ हा त्यांचा गैरसमज असून तो आम्हाला दूर करायचा आहे. जर आपण १९४७ मध्ये पाकिस्तानसोबत गेलो नाही, तर आज का जाऊ? आजही आपण द्विराष्ट्र सिद्धांत स्वीकारण्यास तयार नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आपण सगळे एक आहोत. असे भ्याड हल्ले करून ते आपल्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यामुळे आपण अधिक मजबूत होत आहोत. आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "मी नेहमीच पाकिस्तानशी चर्चा करण्याच्या बाजूने राहिलोय. पण ज्यांनी आपले आप्त गमावले आहेत त्यांना आपण काय उत्तर देऊ? त्यामुळे आता बालाकोट नाही तर आज देशाला अशी कारवाई करायची आहे जेणेकरून असे हल्ले पुन्हा कधीही होऊ नयेत," असेही ते म्हणाले.