देशाच्या शत्रूंना मुळापासून नष्ट करणे हाच समस्येवरचा उपाय!
भारतीय किसान संघची ठोस भूमिका; नरेश टिकैतवरही केली घणाघाती टीका
29-Apr-2025
Total Views | 9
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bharatiya Kisan Sangh on Naresh Tikait) पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय नागरिकांच्या हत्येनंतर भारत सरकारने कठोर पाऊल उचलत पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द केला. यासंदर्भात भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांचे बंधू नरेश टिकैत यांनी भारत सरकारने सिंधू पाणी करार रद्द करणे योग्य नसल्याचे वक्तव्य केले. नरेश टिकैतचे वक्तव्य देशविरोधी शक्तींना पाठबळ देणारे असून देशाच्या शत्रूंना मुळापासून नष्ट करणे हाच समस्येवरचा उपाय असल्याचे भारतीय किसान संघचे अखिल भारतीय महामंत्री मोहिनी मोहन मिश्र यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान समर्थक विधाने कोणाच्या सूचनेने केली जात आहेत, याची चौकशी व्हायला हवी. शेतकऱ्यांच्या नावाने राजकीय आंदोलन करणाऱ्या आंदोलक नेत्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई न करणे हीदेखील गंभीर बाब आहे. त्यामुळे हे लोक उघडपणे देशद्रोही शक्तींचे मुखवटे बनले आहेत. अशा विधानांमुळे दहशतवादी आणि देशविरोधी शक्तींना बळ मिळते. मधल्याकाळात शेतकरी आंदोलनाच्या नावाने देशासमोर आलेल्या घटनेमुळे तथाकथित शेतकरी नेत्यांचे चेहरे उघड झाले. पहलगाम घटनेनंतर भारत सरकारने सिंधू पाणी करार रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात भारतीय किसान युनियनच्या नेत्यांचे वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. या देशद्रोही शक्तींचे समर्थन करणारी विधाने करणाऱ्यांची सरकारने चौकशी करून कारवाई करावी, अशी भारतीय किसान संघाची मागणी आहे.