मुंबई: ( Special precautions in Mumbai after Pahalgam attack ) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्यात येत आहे. “मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख करण्यात येत आहे,” अशी माहिती मुंबई आयुक्तालयातर्फे देण्यात आली आहे.
मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयांतर्गत 139 रेल्वेस्थानके आहेत. दिवसभरामध्ये लोकल ट्रेनच्या जवळपास 7 हजार, 500 ते आठ हजार फेर्या होतात. यामधून दैनंदिन 75 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात. आयुक्तालयांतर्गत या सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे प्रवशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रभावी देखरेख ठेवली जात आहे.
सर्व पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस मित्र, शांतता समिती, प्रवाशांबरोबरच प्रवासी संघटना तसेच कॅन्टिन, रेल्वे, सफाई कर्मचारी, हमाल, बुट पॉलिशवाले यांच्याशी वैयक्तिक संपर्क ठेवला जातो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक माहितीबरोबरच कोणतीही संशयित व्यक्ती, वस्तू असल्यास त्याची तत्काळ माहिती मिळते. प्रत्येक वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला किमान दोन तास क्षेत्रीय ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
प्रत्येक अधिकार्याला चार तास पेट्रोलिंग बंधनकारक
पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रत्येक अधिकार्याला किमान चार तास पेट्रोलिंग करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन प्रवाशांना अचानकपणे तपासणी करण्याची मोहीम सुरू असते. त्यामध्ये विशिष्ट कार्यपद्धती ठरवून देण्यात आली असून त्यानुसारच ही तपासणी करण्यात येत असते. तसेच लोकल ट्रेनमध्येदेखील अचानक तपासणी म्हणजेच ‘मॅसिव्ह फ्लॅश चेकिंग’ करण्यात येते. त्यात एक अधिकारी व त्यांच्यासोबत तीन ते चार कर्मचारी असतात.
चालू लोकलमध्ये प्रवाशांची, रॅकची आणि प्रवाशांसोबत असणार्या सामानाची ते अचानकपणे तपासणी करतात. प्रत्येक दिवशी घातपात तपासणी करण्यात येत असते. या बाबींचे फोटो दर दिवशी विविध पोलीस स्थानकांकडून आयुक्तालयातील अंतर्गत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पोस्ट करण्यात येतात. नियंत्रण कक्षात या फोटोंचे एकत्रीकरण केले जाते. “घातपात तपासणीबाबत मुंबई रेल्वे पोलीस सजग राहून कार्य करत आहेत,” असेही रेल्वे पोलीस आयुक्तालयाने कळविले आहे.मुंबईत विशेष खबरदारी