मुंबई: ( Devendra Fadanvis on Bullet train ) राज्यात २०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमी कॉरिडॉर समिट २०२५मध्ये ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात कृमगतीने सुरू होता. उलट या सरकारच्या काळात तो बंद कसा पडेल या दृष्टीने प्रयत्न झाले, अशी नाव न घेता फडणवीसांनी टीका केली. दरम्यानच्या काळात गुजरातला स्थिर सरकार लाभले. तिथली जमीन अधिग्रहण आणि इतर कामे वेळेत पार पडली. मात्र महायुती सरकार आल्यानंतर आम्ही प्रधान्याने कामे सुरू केली. इथली कामे वेगाने सुरू असून २०२८ पर्यंत पूर्णपणे बुलेट ट्रेन महाराष्ट्रात धावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
५०८ किमी लांबीचा असलेला मुंबई-अहमदाबाद हा प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात या राज्यांसह दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून जाणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे. शिंकानेस हे जपानी तंत्रज्ञान बुलेट ट्रेन निर्मितीसाठी वापरले जात आहे.
बुलेट ट्रेन ३२० किमान तर ३५० कमाल वेगाने धावणार आहे. ५०८ किमी पैकी १५४.७६ किमी मार्ग महाराष्ट्रातून जातो. वांद्रे कुर्ला संकुल, ठाणे, विरार आणि बोईसर ही बुलेट ट्रेनची महाराष्ट्रातील स्थानके आहेत.