दहशतवादाचे समर्थन नाहीच; ‘सुरक्षा परिषदे’ने पाकला सुनावले
27-Apr-2025
Total Views | 10
नवी दिल्ली(United Nations Security Council): पहलगामच्या बैसरन खोर्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’ने (युएनएससी) तीव्र निषेध केला आहे. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणार्या, कृत्य करणार्या आणि वित्तपुरवठा करणार्यांची जबाबदारी घेण्याची मागणी परिषदेच्या सदस्यांनी केली आहे.
शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी जारी केलेल्या निवेदनात १५ सदस्यीय सुरक्षा परिषदेने पुन्हा म्हटले आहे की, “दहशतवाद, त्याच्या सर्व स्वरूपात आणि प्रकटीकरणांमध्ये, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोका निर्माण करतो. सदस्य राष्ट्रांनी या हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना आणि भारत व नेपाळ सरकारला त्यांच्या तीव्र सहानुभूती आणि संवेदना व्यक्त केल्या.”
‘सुरक्षा परिषदे’ने सर्व सदस्य राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय कायदा आणि सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार त्यांच्या जबाबदार्या पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच, सर्व प्रशासकीय संस्थांशी (संबंधित) सक्रिय सहकार्यावर भर देण्यात आला आहे. परिषदेने असे नमूद केले की, “कोणतेही दहशतवादी कृत्य गुन्हेगारी आहे आणि ते कोणी केले, ते कुठेही असले आणि कोणत्याही प्रेरणेने केले असले तरीही ते समर्थनीय ठरू शकत नाही.”
दहशतवादी हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला निर्माण होणार्या धोक्यांना सर्व देशांनी तोंड देण्याची गरज असल्याचे परिषदेने म्हटले आहे. त्यांनी असेही म्हटले की, “ही कारवाई संयुक्त राष्ट्रांच्या सनद, आंतरराष्ट्रीय कायदे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदे, आंतरराष्ट्रीय निर्वासित कायदे आणि मानवतावादी कायद्यांनुसार केली पाहिजे.”