नवी दिल्ली ( Naxalism in Balaghat ): मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या बालाघाट जिल्ह्यातील सुपखार वनक्षेत्रात सुरक्षा दलांनी केलेल्या मोठ्या कारवाईत चार कुख्यात महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्या सर्वांवर एकूण 62 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
घटनेबाबत पोलीस अधीक्षक नागेंद्र कुमार सिंह म्हणाले की, “जंगलांच्या कठीण भौगोलिक परिस्थितीत विशेष सुरक्षा पथकाने ही कारवाई केली. चकमकीदरम्यान झालेल्या भीषण गोळीबारात चारही महिला नक्षलवादी ठार झाल्या. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि नक्षलवादी साहित्य जप्त केले आहे. हे आमच्यासाठी एक मोठे यश आहे. या सर्व महिला नक्षलवाद्यांचा शोध बर्याच काळापासून होता आणि राज्य सरकारने त्यांच्यावर लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
ऑपरेशन्स सुरूच राहतील, ही लढाई इथेच संपत नसून उर्वरित नक्षलवाद्यांचाही खात्मा करण्यात येणार आहे,” असे त्यांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, मारल्या गेलेल्या महिला नक्षलवाद्यांमध्ये दोन छत्तीसगढ आणि एक महाराष्ट्रातील होती. हे सर्व जण सुरक्षा दलांवर हल्ला करणे, गावकर्यांमध्ये दहशत पसरवणे, बेकायदेशीर खंडणी वसूल करणे आणि जनअदालत आयोजित करणे, यांसारख्या गंभीर गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होते.
बालाघाट, मांडला, दिंडोरी आणि आसपासच्या भागांत सुरक्षा दलांच्या सततच्या कारवायांमुळे नक्षलवादी संघटना कमकुवत होत आहेत. अलीकडच्या काही महिन्यांत अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, तर अनेक नक्षलवादी चकमकीत मारले गेले आहेत.