मुंबई : "कोकणी माणसाचे भावविश्व मराठी साहित्यामध्ये योग्य शब्दात चितरणारे मधु मंगेश कर्णिक म्हणजे सामर्थ्य आणि परमार्थाचा अनोखा संगम आहे" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याच्या भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, अध्यक्ष नमिता कीर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की " ईश्वर कृपेचा साहित्यिक साक्षात्कार म्हणजे मधु मंगेश कर्णिक. माहीमची खाडी ते तारकर्ली अशी ७५० किलोमीटरची भूमी कवेत घेणारा मराठी साहित्यिक यापूर्वी कधी झाला नाही. त्यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून कृतकृत्य वाटत आहे."
दि. २५ एप्रिल रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५ व्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी कला आणि साहित्य जगतातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. ९५ व्या वाढदिवसानिमित्त मधु मंगेश कर्णिक यांच्या पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सुद्धा यावेळी पार पडला. त्याचबरोबर अनोखी अशी 'पुस्तक तुला' संपन्न झाली. या अभिष्टचिंतन सोहळ्याची सुरुवात मधु मंगेश कर्णिक यांच्या कवितांनी झाली. मराठीतले आघाडीचे संगीतकार कौशल इनामदार यांनी आपल्या मधुर स्वरातून त्यांच्या कविता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या. यावेळी मधु मंगेश कर्णिक यांचा जीवन प्रवास मांडणारीएक छोटीशी चित्रफीत सुद्धा दाखवण्यात आली. याप्रसंगी उत्कर्ष प्रकाशनाचे सु वा जोशी, मौज प्रकाशनाच्या मोनिका गजेंद्रगडकर आणि मॅजेस्टिक प्रकाशनाचे अशोक कोठावळे यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रतिभावान साहित्यिक कारकिर्दीवर प्रकाश टाकला. या अभिष्टचिंतन सोहळ्या दरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक म्हणाले की जीवनाच्या सायंकाळी कृतकृत्य झाल्यासारखे वाटत आहे. तसेच आता या वाटेवर सगळी कामं संपन्न झाल्यासारखे वाटत आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी रवींद्र नाट्यमंदिरात मधु मंगेश कर्णिक बोलीभाषा अध्यासन केंद्राची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा केली. या केंद्रामध्ये मराठी बोलीभाषेंच्या संशोधनाचे काम केले जाईल. तसेच या कामासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करण्यात येईल असे सुद्धा ते म्हणाले. येणाऱ्या काळात उत्कृष्ट मुखपृष्ठासाठी देखील एक वन्मयीन् पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा सुद्धा उदय सामंत यांनी केली.
'या' ५ बहारदार पुस्तकांचे प्रकासन सोहळा संपन्न!
मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त मॅजेस्टिक प्रकाशनाकडून " राजा थिबा, उधाण आणि स्वयंभू", तसेच उत्कर्ष प्रकाशनाच्यावतीने " स्मृतीजागर" आणि मौज प्रकाशनाच्यावतीने " गूढ निगूढ" या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.