श्रीनगर : ( Pakistan threat! Shahbaz Sharif ) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद वाढला आहे. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये युद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानचे पाणी थांबवले तर पूर्ण ताकदीने उत्तर देऊ अशी पोकळ धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिली आहे.
आता अशा परीस्थितीत पाकिस्तानची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पहलगाममध्ये हिंदूवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय हिंदू पर्यटकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानवर जगभरातून टीका होत आहे.
पाकिस्तान लष्कराच्या पासिंग-आऊट परेडमध्ये बोलताना पंतप्रधान शरीफ म्हणाले की, "पहलगामध्ये घडलेली घटना म्हणजे एकमेकांवर आरोप करण्याची खेळी असून हे आता थांबले पाहिजे. एक जबाबदार देश म्हणून पाकिस्तान या प्रकरणाच्या कोणत्याही बाबतीत तटस्थपणे चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे."
पहलगामला २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोक मारले गेले. कलम ३७० हटवल्यानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी 'द रेझिस्टन्स फ्रंट' या संघटनेने घेतली असून ही संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे. या हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान देशातील संबंध अधिक बिघडले आहेत.
यातूनच भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. तर पाकिस्तानने भारतीय विमानांना आपली हवाई हद्द बंद करून प्रत्युत्तराचा केवीलवाणा प्रयत्न केला आहे. पहलगाममध्ये हिंदूवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून आता युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे.