मुंबई: सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहार करण्याची सवय वाढली असली तरी त्यात धोकेही वाढले आहेत. नागरिकांनी त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहीजेत,असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
बँक किंवा कोणतेही सरकारी कार्यालय कधीही तुमच्याकडून तुमचा UPI पिन मागत नाही. त्यामुळे कोणालाही आपला पिन देऊ नये. तसेच, गुगल पे, फोन पे सारख्या पेमेंट अॅप्सना अॅक्सेस दिल्यास तुमच्या बँक खात्याची माहिती तृतीय पक्षाकडे जाऊ शकते. त्यामुळे अॅप परवानग्या देताना खबरदारी घ्या.
फसव्या वेबसाईट्सवरून फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी वेबसाईटची खातरजमा करणे गरजेचे आहे. सुरक्षिततेसाठी आपला UPI पिन नियमितपणे बदलत राहावा. याशिवाय, एका दिवसासाठी आर्थिक व्यवहाराचे लिमिट निश्चित करावे, जेणेकरून फसवणूक झाली तरी मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार नाही.
ऑनलाईन व्यवहार करताना सतर्कता बाळगा आणि आपली आर्थिक सुरक्षितता जपा, असे आवाहन बँकिंग तज्ज्ञांनी केले आहे.