मुंबई : (Neeraj Chopra) भालाफेक स्पर्धेत भारतासाठी दोन ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणारा भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम याला आगामी काळात भारतात आयोजित केलेल्या एनसी क्लासिक स्पर्धेसाठी आमंत्रित केले होते. यावरुन नीरजवर जोरदार टीका होत होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान नीरजच्या निमंत्रणाची बातमी समोर आल्यानंतर नीरजवर समाजमाध्यमांमधून टीकेची राळ उठली होती. या प्रकरणावर आता नीरजने पहिल्यांदाच भाष्य केले आहे. त्याच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर संताप व्यक्त करत समाजमाध्यमावर एक पोस्ट करून त्याचे म्हणणे मांडले आहे.
नीरज चोप्राने त्याच्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?
"मी अर्शदला एनसी क्लासिक स्पर्धेसाठी निमंत्रण दिले हे एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूला दिलेले निमंत्रण होते. याचे वेगळे अर्थ काढू नयेत. जगभरातील सर्वोत्तम खेळाडू भारतात आणणे हे एनसी क्लासिकचे मुख्य उद्दीष्ट आहे. आपण यावर्षी या विश्वस्तरीय स्पर्धेचे आयोजन करत आहोत. पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याच्या दोन दिवस आधीच मी अर्शदला एनसी क्लासिक स्पर्धेचे निमंत्रण पाठवले होते. पुढच्या ४८ तासांत अशा काही घटना घडल्या की त्यानंतर अर्शदला भारतात निमंत्रित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जिथे देशहिताचा विषय असेल तिथे मी सर्वात पुढे असेन."
नीरज पुढे म्हणाला, "मी अर्शद नदीमला निमंत्रित केल्याबद्दल माझ्या कुटुंबावरही टीका केली जात आहे. आमच्याबद्दल द्वेष पसरवला जातोय, अपप्रचार केला जातोय. हे मी कधीच सहन करणार नाही. माझ्यासाठी नेहमीच राष्ट्रपथम होत आणि आहे. मी कमी बोलणारा माणूस आहे. याचा अर्थ असा नव्हे की माझ्या कुटुंबाबद्दल, देशाप्रती माझ्या मनात असलेल्या प्रेमावर कोणी प्रश्न उपस्थित केले तर मी बोलणारच नाही. मी माझ्या देशासाठी खेळतो, माझ्या देशाचं नाव उंचावण्यासाठी काम करतो. तरी देखील माझ्या ईमानदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हे सगळे पाहून मला खूप दुःख झाले आहे. काही लोक माझ्या कुटुंबालाही यांमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या बाजूला, प्रसारमाध्यमांतील काही लोक माझ्या नावाने वेगवेगळ्या खोट्या गोष्टी पसरवत आहेत. मी त्यावर काही बोललो नाही, बोलत नाही याचा अर्थ असा नाही की ते सगळे खरं असेल."
दरम्यान, पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने २७ ते ३१ मे दरम्यान दक्षिण कोरियातील गुमी येथे होणाऱ्या आगामी आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या तयारीचे कारण देत २४ मे रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या नीरज चोप्रा क्लासिकमध्ये सहभागी होणार नसल्याचे अधिकृतपणे सांगितले आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\