"मी नुसता एसंशी नाही तर..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उबाठा गटाला सडेतोड उत्तर
25-Apr-2025
Total Views | 47
सिंधुदुर्ग : मला 'एसंशि' नाव दिले आहे मात्र मी नुसता 'एसंशि' नसून महाराष्ट्रासाठी ‘एसंशियल’ म्हणजे 'गरजे'चा आहे, असे सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला दिले. विधानसभा निवडणुकीत कोकणवासीयांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्याबाबत आभार व्यक्त करण्यासाठी गुरुवार, २४ एप्रिल रोजी कुडाळ येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रवक्त्या डॉ.ज्योती वाघमारे तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आमच्यावर आरोपांची राळ उठविणारे जेमतेम वीस जागा निवडून आणू शकले आहेत. तरीही नुसती टीका करण्यापलीकडे ते काही करू शकले नाहीत. पहेलगाम हल्ल्यानंतर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे देखील त्यांनी पाठ फिरवली आहे. उबाठा प्रमुख तर स्वतः परदेशात गेले आहेत. मला 'एसंशि' नाव दिले आहे मात्र मी नुसता 'एसंशि' नसून महाराष्ट्रासाठी ‘एसंशियल’ म्हणजे 'गरजे'चा आहे," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "कोकणात महाविकास आघाडीला चारीमुंड्या चित केले आहे. विधानसभेच्या १५ पैकी १४ जागा महायूतीच्या निवडून आल्या असून त्यात शिवसेनेच्या ८ जागा आहेत. हिंदूत्वाच्या मुळावर उठलेल्यांची मशाल कायमची विझवून टाकली. भगव्याने काँग्रेसच्या झाडाला लटकलेल्या उबाठाचा सुपडासाफ केला. त्यांनी नाशिकमध्ये बाळासाहेबांचा नकली आवाज काढला. बाळासाहेबांचा नकली आवाज काढून लोकांना गंडवणे हे कसलं महाराष्ट्र प्रेम आहे? त्यांनी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार बदलले म्हणून मला महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मनातले सरकार आणावे लागले," असेही ते म्हणाले.
कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध!
"एकीकडे लोककल्याणकारी योजना तर दुसरीकडे पायाभूत सुविधांची सुधारणा यावर भर देऊन कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. येत्या काळात मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करणे, मुंबई- सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता तयार करणे याद्वारे कोकणाचा अधिक गतिमान विकास करण्यात येईल. कोकण विकास प्राधिकरणाला अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच युवकांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठीदेखील प्रयत्न केले जातील," अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.