पाकिस्तानी नागरिकांनी तात्काळ भारत देश सोडावा, अन्यथा...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा
25-Apr-2025
Total Views | 32
मुंबई : पाकिस्तानी नागरिकांनी वेळेत देश सोडून जावे. कुणी यात दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. शुक्रवा, २५ एप्रिल रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भारत सरकारने देशात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून त्यांना तात्काळ निघून जाण्यास सांगितले आहे. असे कोणकोणते नागरिक महाराष्ट्रात आहेत त्यांची यादी तयार झाली असून आम्ही मॉनिटरिंग करतो आहोत. त्यांनी वेळेत देश सोडून जावे यादृष्टीने देखरेख केली जाईल आणि कुणी यात दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. व्हिसा रद्द झालेला पाकिस्तानी नागरिक कुठल्याही परिस्थिती भारतात किंवा महाराष्ट्रात राहणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. पाकिस्तानी अभिनेते किंवा पाकिस्तानी खेळाडूंबद्दल आमच्या मनात कोणतीही सहानुभूती नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
"मला या गोष्टीचे अतिशय दु:ख आहे की, या देशाचा इतिहास ते विसरले. देशात युद्धाची वेळ असेल, युद्धसदृश परिस्थिती असेल, देशावर हल्ला असो किंवा देशाच्या संदर्भात एखादा विषय असो याबाबतीत देशातील राजकीय पक्षांनी कधीही पक्ष बघितलेला नाही, हा देशाचा इतिहास आहे. बांगलादेशच्या युद्धाच्या वेळी देशात पक्षा-पक्षांमध्ये टोकाची लढाई सुरु होती. पण त्यावेळीसुद्धा अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना पूर्ण समर्थन दिले होते. हीच या देशाची परंपरा राहिली आहे. पण अशाही परिस्थितीत विरोध करणं, उपहास करणं, मुर्खासारखे वक्तव्य करणं हे उबाठा गटाकडून सुरु असून देशाची जनता त्यांना माफ करणार नाही," अशी टीकाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.