दोन दिवसांत ५०० पर्यटक राज्यात दाखल! पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये होते अडकले

    25-Apr-2025
Total Views |
 
Airport
 
मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर २ दिवसांत सुमारे ५०० पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने तातडीने केलेल्या हालचालीमुळे हे पर्यंटक सुखरूप आपल्या घरी पोहोचले आहेत.
 
जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया या दोन कंपन्यांच्या विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. त्याद्वारे १८४ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, शुक्रवारी आणखी २३२ प्रवाशांसाठी एक विशेष विमान रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तातडीने काश्मीरला रवाना झाले. मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदन या त्रिस्तरीय यंत्रणेद्वारे राज्यातील पर्यटकांच्या मदतीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. काही प्रवाशांना जम्मूमधील कालिका धाम येथे निवासाची तर दिल्लीमध्ये आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यकता असल्यास राज्य सरकारने आणखी विशेष विमानांची तयारी ठेवली असून पर्यटकांच्या सुरक्षित परतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.