"या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करा की,..."; जम्मू काश्मीरमधील हल्ल्यावर काय म्हणाले राज ठाकरे?
23-Apr-2025
Total Views | 41
मुंबई : केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत निषेध व्यक्त केला.
राज ठाकरे म्हणाले की, "जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे सरकारच्या पाठीशी उभी राहील. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की, या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांना ते आठवूनसुद्धा थरकाप उडायला हवा. १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळी इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला. यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की, पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत. केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्यांना कायमचे संपवेल," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
"या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली. एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की, हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला. ही तुमची मुजोरी? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की, या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ. या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे," असे ते म्हणाले.
मनसे सरकारच्या सोबत असेल
"केंद्र सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी. हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाही आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल," असेही राज ठाकरे म्हणाले.