सिंधू जलकरार भारताकडून स्थगित – मोदी सरकारचा पाकला तडाखा, पाकिस्तान पाण्यासाठी तरसणार, अंतर्गत संघर्षही वाढणार
23-Apr-2025
Total Views | 64
नवी दिल्ली : पहलगामच्या पाकिस्तानपुरस्कृत इस्लामी दहशतवादी हल्ल्यानंतपर भारताने पाकला तडाखा देऊन सिंधू जलकरार तत्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय बुधवारी घेतला आहे. यामुळे पाकला प्रामुख्याने सिंचनासह अंतर्गत संघर्षाला तोंड द्यावे लागणार आहे.
पहलगाम येथे झालेल्या इस्लामी दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची (सीसीएस) तातडीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल आणि अन्य उच्च अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयातर्फे अधिकृत पत्रकारपरिषद घेण्यात आली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सीसीएसमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती पत्रकारपरिषदेत दिली.
हल्ल्याचे गांभीर्य ओळखून सीसीएसने पाच निर्णय घेतले असून त्यामध्ये १९६० सालचा सिंधू जलवाटप करार भारताने तत्काळ प्रभावाने स्थगित करण्याची घोषणा केली आहे. पाक जोपर्यंत दहशतवादास असेलला पाठिंबा थांबवत नाही, तोपर्यंत हा करार भारतातर्फे स्थगित राहणार आहे, असे परराष्ट्र सचिव मिस्री म्हणाले. त्याचप्रमाणे भारताने पंजाबमधील अटारी येथील एकात्मिक चेकपोस्ट तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येईल. वैध मान्यतांसह ज्यांनी त्या मार्गाने सीमा ओलांडले आहे ते १ मे २०२५ पूर्वी त्याच मार्गाने परत येऊ शकतात. यापुढे पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना भूतकाळात जारी केलेले कोणतेही एसपीईस व्हिसा रद्द मानले जातील. एसपीईस व्हिसा अंतर्गत सध्या भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्कर, नौदल आणि हवाई सल्लागारांना ‘पर्सना नॉन ग्राटा’ घोषित करण्यात आले आहे. त्यांना भारत सोडण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. भारतही भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागार मागे घेणार आहे. संबंधित उच्चायुक्तालयातील ही पदे रद्द मानली जातील. त्याचवेळी दोन्ही उच्चायोगांमधील कर्मचाऱ्यांची संख्या ५५ वरून ३० पर्यंत कमी केली जाईल, अशी माहिती परराष्ट्र सचिवांनी पत्रकारपरिषदेत दिली आहे.
हे आहेत भारताचे निर्णय
१. १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित.
२. अटारी एकात्मित तात्काळ प्रभावाने बंद. वैध मान्यतांसह ज्यांनी त्या मार्गाने ओलांडले आहे ते १ मे २०२५ पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात.
३ पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना भूतकाळात जारी केलेले कोणतेही एसपीईएस व्हिसा रद्द मानले जातील. त्याअंतर्गत सध्या भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत.
४. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्कर, नौदल आणि हवाई सल्लागारांना भारत सोडण्यासाठी एक आठवड्याची मुदत.
५. भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागार मागे घेणार. संबंधित उच्चायुक्तालयातील ही पदे रद्द मानली जातील.
तपासाची सूत्रे एनआयएकडे
पहलगाम हल्ल्याची सूत्रे राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयकडे आली असून केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे लवकरच संपूर्ण प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात येतील. तत्पूर्वी बुधवारी उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एनआयएच्या पथकाने बैसरनला भेट दिली. या घटनेची माहिती असलेल्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयए पथकाचे सदस्य जम्मू आणि काश्मीर पोलिसांना तपासात मदत करतील. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या प्रॉक्सी, रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याने, जम्मू-काश्मीर पोलिसांना एनआयएने दिलेली मदत एकूण तपासात महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते. एनआयए पथक हल्ल्याच्या ठिकाणाचे सखोल मूल्यांकन करेल, फॉरेन्सिक पुरावे गोळा करेल आणि या नरसंहारासाठी जबाबदार असलेल्यांची ओळख पटवण्यास मदत करणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री ग्राउंड झिरोवर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी दुपारी पहलगामच्या बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेलिकॉप्टरने तेथे पोहोचले. यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना परिसरातील सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या कारवायांची माहिती दिली. पहलगामला जाण्यापूर्वी, केंद्रीय गृहमंत्र्यांनी पीडितांना श्रद्धांजली वाहिली आणि श्रीनगरमधील पोलिस नियंत्रण कक्षाबाहेर पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्याचप्रमाणे शाह यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करून त्यांना दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली.