उद्धव ठाकरेंनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यास...; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान
02-Apr-2025
Total Views | 131
मुंबई : उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यास त्यांच्या मनात बाळासाहेबांचा विचार आहे, असे आम्ही समजू. परंतू, त्यांनी विरोधात मतदान केल्यास ते हिंदूत्वाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
वक्फ विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही असे विधान संजय राऊतांनी केले होते. यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संसदेत येणार आहे. यासाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार मानतो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर वक्फ सुधारणा विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे हे त्यांनी संजय राऊतांना समजावले असते. पण आता त्यांना समजावून सांगणारे कोणीही शिल्लक नाही. उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यास त्यांच्या मनात बाळासाहेबांचा विचार आहे, असे आम्ही समजू. परंतू, त्यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यास ते हिंदूत्वाच्या विरोधात असून मतपेढीच्या राजकारणासाठी आणि मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी हे करत आहेत, असे आम्ही समजू. उद्धव ठाकरेंच्या लोकांनी या विधेयकाला विरोध केल्यास त्यांची पूर्ण शिवसेना रिकामी होईल."
"वक्फ बोर्डाने ज्याप्रकारने हिंदुत्ववादी लोकांवर अन्याय केला, अनेक धार्मिक संस्थानांच्या जमिनी लाटल्या त्यावरून वक्फ बोर्डाचा आणि हिंदूत्वाचा संबंध कसा येत नाही? वक्फ बोर्डाने मनमानी केली. मराठी माणसाच्या अनेक जमिनी लाटल्या. मुस्लिम लोकांच्या जमिनी सोडून हिंदू समाजाच्या जमिनी लाटण्याचे काम केले. संजय राऊत यांच्या बोलण्यावरून ते वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करतील असे दिसते. सभागृहात काय होते ते माहिती नाही. वॉकआऊट न करता या विधेयकाच्या बाजूने मतदान केले तर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार जपले असा त्याचा अर्थ होतो," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "संजय राऊतांना भाजपच्या भूमिकेचा कावीळ झाला आहे. मोदीजींचे नाव घेतल्यावर त्यांना पंडूरोग होतो आणि तो दुरुस्त होऊ शकत नाही. देशाचे पंतप्रधान १४० कोटी जनता ठरवते. देशाने २०२९ पर्यंत मोदीजींना पंतप्रधान म्हणून निवडले आहे आणि पुढच्या काळातसुद्धा मोदीजींच्या नेतृत्वात भारत समोर जाणार आहे. मोदीजींनी २०४७ च्या विकसित भारताचा संकल्प केला आहे," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.