छत्रपती संभाजीनगर आणि जालना महाराष्ट्राचे नवे इंडस्ट्रियल मॅग्नेट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19-Apr-2025
Total Views |
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर आणि जालना आता महाराष्ट्राचे नवे इंडस्ट्रियल मॅग्नेट आहे. इथे सर्वांना सोबत घेऊन जाण्याची एक चांगली परंपरा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती संभाजीनगर येथे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (CMIA) आयोजित 'उद्योजक संवाद' कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मंत्री जयकुमार रावल, मंत्री अतुल सावे, खा. भागवत कराड, 'मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर'चे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "छत्रपती संभाजीनगरचे उद्योग आणि उद्योजकांच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, येथे सर्वांना सोबत घेऊन जाण्याची एक चांगली परंपरा आहे. अनेकवेळा व्यवसाय करत असताना व्यक्ती स्वतःचा आणि स्वतःच्या व्यवसायाचा विचार अधिक करतो. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथे एक सामूहिक एकी आणि शक्ती दिसते. ही शक्ती सातत्याने या शहराला इंडस्ट्रियल मॅग्नेट बनवण्याचे काम करते. याबाबतीत 'सीएमआयए'सारखी संस्था एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. आता छत्रपती संभाजीनगर-जालना महाराष्ट्राचे नवे इंडस्ट्रियल मॅग्नेट आहे."
छ. संभाजीनगरमध्ये स्वतंत्र संरक्षण उद्योग पार्क उभारणार!
"ऑरिक सिटीमध्ये १० हजार एकरावर इंडस्ट्रियल सिटी उभारण्यात आलेली आहे, आज तिथे एकही प्लॉट शिल्लक नाही. आणखी ८ हजार एकर जमीन लवकरच राज्य शासन अधिग्रहण करणार असून दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमुळेही येथे उद्योग क्षेत्रासाठी लागणारी एक संपूर्ण इको-सिस्टिम विकसित झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा याठिकाणी वाढत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील उद्योग क्षेत्र या भागात संरक्षण क्षेत्रातील उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्य शासनही येथे स्वतंत्र संरक्षण उद्योग पार्क उभारणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वात मुंबई, नागपूर, पुणे, अहिल्यानगर येथे डिफेन्स क्लस्टर सुरु झालेले आहे. या क्लस्टरमध्ये आधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती होत आहे. संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योगांमध्ये छत्रपती संभाजीनगरला अग्रस्थानी आणण्यासाठी राज्य शासन खंबीरपणे येथील उद्योग क्षेत्राच्या पाठीशी उभे आहे," असेही ते म्हणाले.