भारतीय अर्थव्यवस्था ६.५ टक्के विकासदर राखणार, संयुक्त राष्ट्रांचा अंदाज
जागतिक अस्थिरतेतही भारत आपले स्थान राखणार
18-Apr-2025
Total Views | 14
नवी दिल्ली : सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आपला जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हा लौकिक कायम ठेवणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. देशांतर्गत मागणीत झालेली वाढ त्यामुळे उत्पादनाला मिळणारी चालना यांमुळे भारत हा विकासदर गाठू शकेल असे या अहवालात म्हटले आहे. सध्या सुरु असलेल्या व्यापार युध्दाच्या काळात जागतिक अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा वृध्दीदर हा २.३ टक्क्यांपर्यंत घसरणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिध्द केलेल्या ‘व्यापार आणि विकास दृष्टीकोन २०२५’ या अहवालात ही माहिती समोर आलेली आहे. या अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेत निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणाची गंभीरता अधोरेखित करण्यात आली आहे. यामध्ये जागतिक पातळीवर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या व्यापार धोरणातील अनिश्चितता, बांग्लादेश, श्रीलंका यांसारख्या छोट्या देशांवर वाढत असलेला कर्जाचा धोका, यामुळे जागतिक बाजारात मंदीसदृश वातावरण तयार होणार आहे. यामुळे काही काळानंतर गुंतवणुकीच्या दृष्टीनेही अनिश्चिततेचे वातावरण तयार होणार आहे.
भारतीय अर्थव्यवस्था तीन वर्षात चीन व जपानला मागे टाकेल – बी.व्ही. आर. सुब्रमण्यम
भारतीय अर्थव्यवस्था येत्या तीन वर्षात चीन आणि जपानला मागे टाकत, जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. २०४७ पर्यंत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला आहे. भारतातील सक्षम लोकशाही हीच भारताची सर्वात मोठी ताकद आहे. भारत भविष्यात जगाचे शिक्षणाचे केंद्र बनु शकेल. त्यामुळे भारताला येत्या काळात सर्वात जास्त वाव आहे. यामुळेच भारत हे सर्व साध्य करु शकेल असाही विश्वास बी.व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला आहे.