मुंबई शेअर बाजार हे भारताच्या अर्थशक्तीचे प्रतीक आहे – अर्थमंत्री निर्मला सितारामन

मुंबई शेअर बाजाराच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

    17-Apr-2025
Total Views |
 
nirmala
  
मुंबई : मुंबई शेअर बाजार हा भारतीयांच्या अर्थशक्तीचे प्रतीक आहे, अशा शब्दांत गौरव करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शेअर बाजाराचे महत्व विशद केले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच मुंबई शेअर बाजाराचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मुंबई शेअर बाजारात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी भूषवले.
 
 
 
 
 
या प्रसंगी त्यांनी गुंतवणुकदार तसेच कंपन्यांना सातत्याने नाविन्याचा शोध घेण्याचे आवाहन केले. “ सर्व गुंतवणुकदार, दलाल यांना माझे निवेदन आहे की गुंतवणुकदरांचे नाविन्यतेचा शोध घेत रहा. आपल्याला दीर्घ काळासाठी संपत्ती निर्मितीत योगदान द्यायचे आहे, त्यासाठी लागणारा संयम चिकाटी गुंतवणुकदारांनी दाखवायला हवी. सर्व कंपन्यांनी इथे गुंतवणुक करत असताना अतिशय पारदर्शी व्यवहार करणे गरजेचे आहे. सर्वात मुख्य म्हणजे या सर्व कामांमध्ये कुठेही गैरप्रकार होणार नाहीत यासाठी बाजार नियामकांनी सजग राहून काम करणे गरजेचे आहे” असे सितारामन यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगीतले.
  
 
 
 
 
मुंबई शेअर बाजाराने आपल्या आजवरच्या कारकीर्दीत ८० हजारांचा उच्चांक गाठला आहे. गेले काही दिवस जागतिक अर्थव्यवस्थेतील उलथापालथींमुळे शेअर बाजारालाही तेजी – मंदीचे झोके अनुभवायला मिळत आहेत. तरीही शेअर बाजाराने गुंतवणुकदारांचा विश्वास कायम राखला आहे हे कौतुकास्पद आहे. असे सितारामन यांनी गौरवोद्गार काढले.
 
 
एका झाडाखाली झाली होती शेअर बाजाराची सुरुवात
 
 
१८७५ साली मुंबईतील दलाल स्ट्रीटवर एका वडाच्या झाडाखाली त्यावेळी मुंबईतील काही प्रतिष्ठित उद्योगपतींनी एकत्र येऊन आपसांत समभाग खरेदीचे व्यवहार केले. ही मुंबई शेअर बाजाराची सुरुवात मानली जाते. १५० वर्षे अव्याहतपणे चालणारा आशियातील सर्वात जुना शेअर बाजार म्हणून याचा लौकिक आहे. आजही मुंबई शेअर बाजाराच्या स्थापनेचा साक्षीदार असलेला तो वटवृक्ष आजही पर्यटकांचे आकर्षण ठरतोय.