"रायगडला केवळ पर्यटनस्थळ नव्हे तर..."; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन
12-Apr-2025
Total Views | 45
रायगड : रायगडला केवळ पर्यटनस्थल नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवार, १२ एप्रिल रोजी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासादार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "याच जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. बाल शिवाजीच्या जन्मापासून तर त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंचा इतिहास या पवित्र भूमीत आहे. रायगडला केवळ पर्यटनस्थळ नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे. सातवीपासून ते बारावीपर्यंतचा प्रत्येक विद्यार्थी एकदातरी या प्रेरणास्थळावर आला पाहिजे. ही स्वराज्याची, स्वधर्माच्या सन्मानाची आणि स्वभाषेला अमर करण्याची लढाई कधीही थांबू नये, हा शिवरायांचा अंतम संदेश होता. मोदीजींच्या नेतृत्वात ही लढाई शिवरायांची वाजी ही लढाई गौरवाने पुढे जात आहे," असे ते म्हणाले.
"स्वधर्माचा अभिमान, स्वराज्याची आकांक्षा आणि स्वभाषेला अमर बनवणे हे तीन विचार देशाच्या सीमेशी जोडलेले नसून मानवी जीवनाच्या स्वाभिमानाशी जोडले आहेत. या तीन मूळ चरित्रांना शिवाजी महाराजांनी जगासमोर ठेवले. गुलामगिरीची मानसिकतेला छेद देत शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्याच्या सूर्याला दैदिप्यमान करण्याचे काम केले," असेही अमित शाह यावेळी म्हणाले.