कॅन्सल चेक, एम्प्लॉयर व्हेरिफिकेशनची अट काढून टाकली
10-Apr-2025
Total Views | 11
मुंबई : देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओतून रक्कम काढणे आता अधिक सुलभ होणार आहे. ही रक्कम बँकेतून काढण्यासाठी या आधी कॅन्सल चेक, एम्प्लॉयर व्हेरिफिकेशन या अटींची पूर्तता करावी लागत होती. आता नवीन नियमांनुसार ही अट शिथिल करण्यात आली आहे. देशातील लाखो कामगारांना त्यांच्या भविष्यासाठी ठेवलेले पैसे वापरण्यासाठी आता सुलभता येणार आहे.
देशाचे श्रम आणि रोजगारमंत्री मनसुख मांडवीय यांनी याबाबत घोषणा करताना “ कर्मचाऱ्यांना आपली हक्काची रक्कम मिळवणे सोपे व्हावे आणि त्या रकमेचा वापर करणे सहज शक्य व्हावे यासाठी हे दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे देशातील ७ कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होईल” असे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत नमुद केले आहे.
यासुधारणांमुळे देशातील कर्मचाऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. या नवीन नियमावलीत कर्मचाऱ्यांना या ईपीएफओमधून पैसे काढण्यासाठी याआधी कॅन्सल चेकचा फोटो टाकणे, स्वप्रमाणित पासबुक झेरॉक्स अपडेट करणे याअटींची पूर्तता करणे बंधनकारक होते. परंतु आता या अटी काढून टाकण्यात आल्या आहेत. याविषयी प्रायोगिक तत्वावर काम चालू होते. तो प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता त्याची देशव्यापी अंमलबजावणी सुरु करण्यात येणार आहे.
यासुधारणांबरोबरच केंद्र सरकारने याआधीच ईपीएफओच्या रकमेबाबत आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीची रक्कम आता एटीएममधून काढण्याची सोय उपलब्ध होणार आहे. याचबरोबर या रकमेचे व्यवहार आता युपीआयमार्फत देखील करता येण्याची सोय उपलब्ध होणार आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाहनिधीतील या सुधारणांमुळे देशातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.