ठाणे: ( gudipadwa in thane ) “ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, चौकाचौकात रांगोळ्या... भगवे झेंडे-उपरणे आणि समाज प्रबोधनाचे धडे देणारे आकर्षक चित्ररथ,” अशा उत्साही वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या ‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास’ आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ठाणेकरांनी संस्कृतीचा महाकुंभ अनुभवला.
यंदा स्वागतयात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. रविवार, दि. ३० मार्च रोजी सकाळी ७ वाजता श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे विधीवत पूजन करून प्रारंभ झालेल्या यात्रेत सर्वधर्मीयांचा उत्साह दिसून आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, माजी खा. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि स्वागतयात्रेचे स्वागताध्यक्ष शरद गांगल आदी मान्यवरांनी पालखीचे भोई होत तमाम ठाणेकरांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, ठाण्यात घरोघरी गुढी, तोरणे उभारून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.
‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासा’तर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी कौपिनेश्वर मंदिरातून मुख्य स्वागतयात्रा काढण्यात आली. स्वागतयात्रेला जोड म्हणून ठाणे शहरात १२ उपयात्रा निघाल्या होत्या. मुख्य स्वागतयात्रेत ठाणे महापालिकेचा विशेष सहभाग होता. राज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त चित्ररथ, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण, प्लास्टिक बंदी, अवयवदान जागृती, मतदान जागृती आदी ६० चित्ररथांद्वारे प्रबोधन करण्यात आले.
स्वागतयात्रेत खा. नरेश म्हस्के, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव, ‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासा’चे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्यवाह डॉ. अश्विनी बापट, अरविंद जोशी, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण आदींनी नागरिकांसमवेत पायपीट करीत सहभाग नोंदवला. यंदा हिंदी भाषिकांसह राजस्थानी, दाक्षिणात्य, शीख, पारसी, जैन यांसह मुस्लीम बांधव आणि विविध प्रांतातील ठाणेकर नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते.
महिला बाईक रॅलीसह चित्ररथांनी वेधले लक्ष
पारंपरिक वेषभूषा परिधान करून महिला बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. मुख्य चौकांमध्ये सामाजिक संस्थांकडून पालखी आणि चित्ररथांवर पुष्पवृष्टी करण्यात आली होती. तर, ठाणे महापालिका शिक्षण, आरोग्य, घनकचरा व पाणीपुरवठा विभागाचे चित्ररथ याठिकाणी पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेचा यंदा पहिल्यांदाच चित्ररथ यात्रेत सहभागी झाला होता. त्यावर विविध योजनांची माहिती देण्यात आल्याने या चित्ररथाने सर्वसामान्यांचे लक्ष वेधले.
राज्यातील उद्योगांना ‘रेड कार्पेट’
“राज्यात उद्योगांना ‘रेड कार्पेट’ अंथरले आहे. येथे मोठ्या प्रमाणात दळणवळणाची सुविधा आहे. कुशल कामगार आहेत. आपण सकल राष्ट्रीय उत्पन्नात, उद्यमींमध्ये प्रथम आहोत. अर्थव्यवस्थेत आपली स्थिती इतर राज्यांपेक्षा चांगली आहे. विदेशी गुंतवणूकदार राज्यात येत आहेत. कारण, येथील वातावरण चांगले आहे. आमच्या सरकारने विविध योजना राबवून विजयाची गुढी उभारली आहे. भविष्यामध्ये राज्यासाठी विकासाचे पर्व आणखी वेगाने पुढे न्यायचे आहे,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वागतयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना सांगितले.