मुंबईतील रस्त्यांवरच्या डांबराचे ‘सांबार’ कुणी खाल्ले?
कार्यकर्त्यांनो पेटवा मशाल, आम्ही झोपतो खुशाल!
27-Mar-2025
Total Views | 9
3
मुंबई: ( eknath shinde on UBT ) “मुंबईच्या रस्त्यांवरून काहीजण प्रश्न विचारत आहेत. पण, इतकी वर्षे डांबराचे ‘सांबार’ कुणी खाल्ले? हे त्यांनी स्पष्ट करावे. आरशात पाहून वारसा सांगता येत नाही,” असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला लगावला. विधान परिषदेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते उत्तर देत होते.
शिंदे म्हणाले, “कार्यकर्त्यांनो ‘पेटवा मशाल, आम्ही झोपतो खुशाल,’ अशी यांची अवस्था आहे. ते कार्यकर्त्यांना कचरा समजतात. त्यामुळेच त्यांना आम्ही हायव्होल्टेज शॉक दिला. सध्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू आहे. त्यामुळे लोकांना थोडा त्रास होतो आहे. परंतु, त्यानंतर पुढील २५ वर्षे मुंबईत खड्डे दिसणार नाहीत. डांबरात हात काळे करण्याची संधी त्यांना मिळणार नाही. पोपटाचा जीव पिंजर्यात असतो, तसा यांचा जीव मुंबईतील रस्त्यांत आहे. मागच्या अनेक वर्षांत डांबराचे सांबार कुणी खाल्ले, हे आता समोर यायला हवे,” असा हल्लाबोल शिंदे यांनी केला.
“विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव हा उथळ होता. अनेक विषय रिपीट झालेले आहेत. आता महायुतीची दुसरी इंनिंग सुरू झाली आहे. ‘नो रिझन, ऑन दी स्पॉट डीसिजन’ देणारे आमचे सरकार आहे. ‘रिझन’ देणार्यांचा ‘सिझन’ जनतेने संपवून टाकला आहे. महाराष्ट्राला देशात एक नंबर करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. राज्यात पायाभूत सुविधांची दहा लाख कोटी रुपयांची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. नवी मुंबई विमानतळ, वाढवण बंदर विकासाचे काम सुरू आहे. ‘कनेक्टिव्हिटी’वर आम्ही भर दिला आहे. उद्योजक, व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. पर्यटन विकासासाठी प्रयत्न करीत आहोत. मे महिन्यात मोठा पर्यटन महोत्सव महाबळेश्वरमध्ये घेतला जाणार आहे,” असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आरशात पाहून वारसा सांगता येणार नाही
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना देवेंद्र फडणवीस औरंगजेबासारखे वाटले. त्यांना सांगायला हवे, सगळीच वेळ सारखी नसते. ‘मशाल पेटवून, खुशाल झोपा’ काढणार्यांना आता शहाणपण आले असेल. गद्दार, गद्दार म्हणून टीका करीत बसलात. आरशात पाहून वारसा सांगता येत नाही, हे लक्षात ठेवा. खोट्या केसेस उभ्या करून देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना अटक करण्याचा प्रयत्न करताना कुठे होते संविधान? नारायण राणे यांना अटक करताना, राणा दाम्पत्याला त्रास देताना संविधान आठवले नाही? वाझे काय लादेन आहे का, असे म्हणताना संविधान आठवले नाही? कंगणा राणावत यांच्या घरावर बुलडोझर चालवताना संविधान आठवले नाही? असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.