वाडा: ( MP Savra meets minister gadkari for road demand ) “अर्धकुंभ मेळा २०२७ नाशिक या महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनोर-पालघर आणि जव्हार-मनोर या महामार्गांच्या दुरुस्ती व विस्तारासाठी तातडीने निधी मंजूर करा,” अशी मागणी खा. डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
अर्धकुंभ मेळा हा लाखो भक्त, पर्यटक आणि साधू-संतांचे केंद्रबिंदू असलेला ऐतिहासिक सोहळा आहे. यामुळे नाशिककडे जाणार्या विविध मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यातील हा महामार्ग धार्मिक, व्यापारी आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने त्याचा विकास अत्यावश्यक आहे. सध्या या महामार्गांची परिस्थिती अत्यंत खराब असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
अपघातांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांना व वाहनचालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खा. डॉ. सवरा यांनी या मार्गाच्या दुरुस्ती व चौपदरीकरणासाठी आवश्यक निधी तत्काळ मंजूर करण्याची विनंती केली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती खा. सवरा यांनी दिली.