स्टार्टअपमध्ये गुंतवणुक करण्यात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर, पहिल्याच तिमाहीत २.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणुक
तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्सना जास्त पसंती
25-Mar-2025
Total Views | 12
नवी दिल्ली : देशातील वाढत्या स्टार्टअप संस्कृती फोफावताना दिसत आहे. देश पातळीवर केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारे या स्टार्टअप्सना बळ देण्यासाठी गुंतवणुक करत आहेत. याच वेळी देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणुकदारांकडून या स्टार्टअप्स मध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढतोच आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच या स्टार्टअप मध्ये तब्बल २.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणुक झाली आहे. या गुंतवणुकीत आता भारताचा अमेरिका आणि ब्रिटन नंतर तिसरा क्रमांकावर पोहोचला आहे. ट्रॅक्शन या मंचाच्या अहवालात हे स्पष्ट झाले आहे.
भारतात सर्वात जास्त गुंतवणुक झालेल्या क्षेत्रांत वाहन तंत्रज्ञान, व्यवसाय प्रक्रिया उद्योग, रिटेल या क्षेत्रांचा समावेश होतो आहे. स्टार्टअपमध्ये सध्या झालेली गुंतवणुक ही गेल्या तिमाहीपेक्षा १३.६४ टक्क्यांनी जास्त आहे. तर गेल्यावर्षीच्या याच तिमाहीशी तुलना केली तर ही गुंतवणुक ८.७ टक्क्यांनी जास्त आहे. यावरुन हे लक्षात येते की भारतीय स्टार्टअप्सवर जागतिक पातळीवर विश्वास वाढतोय. सर्वात जास्त गुंतवणुक खेचणाऱ्यांमध्ये दिल्लीचा पहिला क्रमांक लागतो. या परिसरातील तंत्रज्ञानाधारित स्टार्टअप्समध्ये एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्के गुंतवणुक झाली आहे. त्यानंतर बेंगळुरुचा क्रमांक असून तेथील स्टार्टअप्समध्ये २१.६४ टक्के इतकी गुंतवणुक झाली आहे.
यावरुन भारतीय बाजारातील स्टार्टअप्सची स्वीकार्हता देखील वाढत आहे हे दिसून येते. याच काळात तब्बल सहा कंपन्यांनी आयपीओ दाखल केले आहेत. एकूण ३८ कंपन्यांमध्ये विलीनीकरण प्रक्रिया घडून आली. यातून भारताची स्टार्टअप बाजारपेठ विकसित होत आहे असे म्हणता येईल असे हा अहवाल सांगतो.
ट्रॅक्शन या मंचाच्या सहसंस्थापिका नेहा सिंग यांच्या मते, जागतिक पातळीवर गुंतवणुकीची बाजारपेठ सतत बदलत असताना भारतीय स्टार्टअप बाजारपेठेने आपली स्वीकारार्हता आणि सुसंगतता टिकवून ठेवली आहे हे भारताचे यश आहे. भारतातील तंत्रज्ञानाधारित स्टार्टअप जास्त गुंतवणुक खेचत आहेत यातून भारतीय बाजारपेठ अजूनच चांगल्या स्थितीत जात आहे असे निश्चित म्हणता येईल.