नागपूर: ( Curfew in Nagpur city ) नागपूर शहरात सोमवार, दि. १७ मार्च रोजी औरंगजेबाच्या कबर प्रकरणात ‘विश्व हिंदू परिषदे’ने काढलेल्या मोर्चानंतर दोन गटांत तुफान दगडफेक, जाळपोळ आणि हिंसाचार झाल्याची घटना घडली. यावेळी, उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संचारबंदी उठविण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार रविवार, दि. २३ मार्च रोजी दुपारी 3 वाजता संपूर्ण शहरातील संचारबंदी हटवण्यात आली.
नागपूर शहरातील कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी उपाययोजना म्हणून शहरातील ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. मात्र, दंगलग्रस्त भागाशिवाय अन्य परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने संचारबंदी उठविण्यास पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली होती. गुरुवारी नंदनवन आणि कपिलनगरमधील संचारबंदी पूर्णतः हटविण्यात आली. तर, शनिवारी पुन्हा पाच ठाण्यांतर्गत संचारबंदी पूर्णतः हटविण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. यामध्ये परिमंडळ-३ अंतर्गत येणार्या पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, परिमंडळ-४ अंतर्गत येणार्या सक्करदरा आणि इमामवाडाचा समावेश आहे. मात्र, यशोधरानगरात संचारबंदी कायम ठेवण्यात आली होती. कोतवाली, तहसील, गणेशपेठमध्ये सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत संचारबंदी शिथील करण्यात आली होती.
बहुतांश भाग बाजारपेठांमधील व्यापार्यांसह विद्यार्थ्यांचेदेखील शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे शनिवारी पोलीस आयुक्तांकडून स्थितीचा पुन्हा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा आणि इमामवाडा ठाण्यांतर्गत संचारबंदी पूर्णतः हटविण्याचे निर्देश दिले. परिमंडळ-3 मधील कोतवाली, तहसील, गणेशपेठ हद्दीतील संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली. सायंकाळी ७ ते रात्री १० या कालावधीत लोक बाहेर पडू शकतात आणि या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येऊ शकते, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले होते. तरीही अनेकांना सामान्य जीवन जगताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी रविवारी दुपारी ३ वाजेपासून शहरातील संपूर्णतः संचारबंदी हटवली. तसे आदेश पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी जारी केले.
पोलीस बंदोबस्त कायम
- भालदारपुरा, मोमीनपुरा, चिटणीस पार्क चौक, हंसापुरी यांसह अन्य तणावग्रस्त भागांत पोलिसांचा तगडा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. या भागातील संचारबंदी उठवली, तरी सशस्त्र जवान अजूनही रस्त्यावर कायम ठेवण्यात आले आहेत.
- पोलिसांची गस्तसुद्धा या परिसरात वाढविण्यात आली आहे. संचारबंदी हटवल्यानंतरही संशयास्पद हालचाली करीत असल्यास ताबडतोब ताब्यात घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहे.