महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी तथाकथीत अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. यामुळेच २० मार्च हा दिवस "सामाजिक सबलीकरण दिन" म्हणून भारतात साजरा केला जातो. ही डॉ.आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती. या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते.
भारतीय जातीव्यवस्थेमुळे अस्पृश्यांना तथाकथीत उच्च जातीय हिंदूंपासून वेगळे ठेवण्यात आलेले होते. अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्रोतामधून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास परवानगी नव्हती. ऑगस्ट १९२३ मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांना ही वहिवाटीचा हक्क असेल. महाडच्या नगरपालिकेने ही जानेवारी १९२४ साली ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नव्हती.
कोकणातील महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण, उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती. त्यामध्ये अनंत विनायक चित्रे, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे तसेच सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेचे प्रमुख त्यांत सहभागी होते. यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रह दरम्यान डॉ.आंबेडकरांना मदत करण्याचे काम ते करीत होते. १९२७ साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती/सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले. सभेनंतर सर्वजण चवदार तळ्याकडे गेले. डॉ.आंबेडकरांनी सर्वात प्रथम त्या तळ्यांमधून पाणी पिले आणि त्या नंतर जमलेल्या सर्व लोकांनीही त्या तळ्याचे पाणी पिले. त्यावेळी स्त्री-पुरुष मिळून सुमारे ५००० जण ह्या सभेसाठी आणि नंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते. त्यातील पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेले होते, हातात काठी घेतलेला पुरुष म्हणजे महार जातीच्या पुरुषांचे चिन्ह होते.
सत्याग्रहींवर सनातन्यांचे अत्याचार
जरी महाड नगर पालिकेने सरकारी अखत्यारीतील सर्व पाणवठे अस्पृश्यांना खुले केले असले तरीही त्या पाणवठ्यांवर तसा कसलाही उल्लेख केला गेलेला नव्हता. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने अस्पृश्य जमा होऊनही त्यांनी आसपासच्या कोणत्याही पाणवठ्यावरून पिण्यासाठी पाणी घेण्याची हिंमत केली नाही. म्हणूनच ह्या सभेसाठी म्हणून आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी ४० रुपये किमतीचे पाणी उच्च जातीय हिंदूंकडून विकत घेण्यात आले होते. कारण सभेच्या ठिकाणी अस्पृश्यांना आसपासच्या पाणवठ्यावरून पाणी घेण्यास मनाई होती.
चवदार तळ्याचे पाणी पिऊन आंबेडकर ते सभेपुरते रहात असलेल्या सरकारी बंगल्यावर परतले आणि इतर सर्व लोक सभेच्या मंडपात परत गेले. चवदार तळ्यावरुन सर्वजण निघाल्यानंतर सुमारे दोन तासाच्या आतच महाड गावात एक अफवा उठली की, "तळ्यातील पाणी बाटवल्या नंतर आता जमलेला जमाव वीरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहे." धर्म धोक्यात आल्याचे अन्य जातीय हिंदूंनी महाड गावभर पसरवले. त्यातून अन्य जातीय हिंदूंचा एक घोळका हत्यारे, लाठ्या-काठ्या घेउन सभेच्या ठिकाणी आला आणि त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करत असणाऱ्या अस्पृश्यांना मारहाण केली. हा अन्य जातीयांचा घोळका नंतर महाड शहरभर फिरुन सर्व अस्पृश्यांना धमकावत होता. शिवाय आसपासच्या सर्व गावांमध्ये देखील ह्या सभेला आलेल्या सर्व अस्पृश्यांना धडा शिकवण्याबद्दल संदेश पोहोचवला गेला. त्यामुळे अनेक अस्पृश्यांना स्वतःच्या गावी पोहोचल्यानंतरही हिंसेला सामोरे जावे लागले. ह्या सत्याग्रहाला गांधींनी पाठिंबा दिला आणि, स्पृश्यांनी अस्पृश्यांवर अश्या प्रकारे हिंसा करुन चुक केली आहे असे मत त्यांच्या यंग इंडियामध्ये प्रकाशित केले.
विरेश्वराच्या मंदिराच्या गुरवाने अस्पृश्यांनी विरेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा कट रचला आहे अशी अफवा उठवल्या मूळे गावातील सनातनी हिंदुंनी सत्याग्रहासाठी आलेल्या लोकांवर हिंसा केली. परंतु अहिंसा हे तत्त्व मानणाऱ्या आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिंदूंविरूद्ध "हिंसा करू नका" असा आदेश दिला होता.प त्यामुळे एवढी हिंसा होऊनही आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम ठेवला व त्याबद्दल गांधींनी सर्व सत्याग्रहींचे कौतुकही केले होते
नंतर १९ मार्च १९४० रोजी डॉ.आंबेडकर यांनी महाडमधे १४वा महाड सत्याग्रह दिन आयोजित केला. महाड शहरात डॉ. आंबेडकर यांचा मोर्चा व सभा झाली. या दिवशीं महाड नगरपालिका प्रेसिडेंट, ॲड. विष्णु नरहरी खोडके यांनी एक समारंभ आयोजित करुन आंबेडकर यांना मानपत्र देऊन गौरविले. डॉ. आंबेडकर यांनी तेव्हा उत्तरादाखल एक भाषणही केले. खोडके यांनी दिलेले हे मानपत्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण महाराष्ट्र सरकार कडुन प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे "खंड १८, भाग २ या मध्ये उल्लेख केले गेले आहे. खोडके यांनी १९३१ पासुन डॉ.आंबेडकर यांच्या चळवळींना पाठिंबा दिला होता. १९५७ मध्ये प्रकृती अस्वास्थ्य मुळे वकिली करणे बंद केले. पुढे ४ मार्च १९५९ रोजी त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या सन्मानार्थ चवदार तळ्याजवळील एका रस्त्याला "ॲड. व्ही.एन. खोडके मार्ग" असे नाव देण्यात आले.
दलित महिलांचा सहभाग आणि डॉ.आंबेडकरांचे आवाहन
ह्या सत्याग्रहासाठी स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असल्याने, आंबेडकरांनी स्त्रियांना खास आवाहन केले आणि यापुढे आपली जात दाखवणारी कोणतीही लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगण्याविषयी व पुरुषांनाही हातात कायम काठी ठेवणे सारखी चिन्हे बाळगण्याची आता गरज नाही, असे उपस्थित स्त्री-पुरुषांना आवाहन केले. तत्कालिक स्त्रिया तेव्हा गुडघ्या पर्यंतच तोकडे लुगडे नेसत असत. डॉ.आंबेडकरांनी स्त्रियांना इतर उच्च जातीय स्त्रीयांसारखे पुर्ण टाच घोळ लुगडे नेसण्याचे सुचवले. त्याची अंमलबजावणी लागलीच पुढच्या काही दिवसांत घडताना दिसू लागली
महाड पाणी स्पर्श बंदी उठत असताना....
तथाकथीत दलित बांधवांकडून आदर्श व्यवहार
१)विधायक मार्गाने मागणी केली गेली
२)ग्रामस्थांवर प्रतिहल्ला नाहि हा आदेश पाळला गेला.
३)सर्व जातींचा सहभाग घेतला
४)जातीयवादी न्यूनता दाखवणारी लक्षणे सोडली. उदा. भगिनींकडून- तोकडे लुगडे, बांधवांकडून- हातात काठी
दलितेतर अन्य समाज बांधवांकडून आदर्श व्यवहार
१)मुक्त प्रवेशाच्या कायदा अंमलबजावणीचा निर्णय
२)सभेसाठी बाबासाहेबांना निमंत्रण,
३)नगर पालिकेकडून बाबासाहेबांचा गौरव
४)आंदोलन यशस्वी करणारेंची रस्त्यांना नावे
महाड गावातील या सामाजिक क्रांतिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत गावोगावी या दिवसा निमीत्त कुप्रथा सोडणे व सुप्रथा स्वीकारण्याची सुरवात होवू शकेल का?
प्रत्येकाने विचार करावा मला कोणती कुप्रथा सोडून, कोणती सुप्रथा नव्याने सुरु करता येईल?
१)व्यक्तिगतस्तर, २)कुटुंबस्तर, ३)गावस्तर
निलेश गद्रे