"होय! माझं मोदींबद्दलचं ते भाकीत चुकलं!", शशी थरूर असं का म्हणाले?
रशिया-युक्रेन युद्धाबद्दल भारताच्या भूमिकेवरुन मोदींना डिवचणाऱ्या थरूरांनी दिली कबुली
19-Mar-2025
Total Views | 19
1
नवी दिल्ली : (Shashi Tharoor admits) गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia-Ukraine War)सुरु आहे. या युद्धात प्रचंड विध्वंस झाला आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही अद्याप या भागात शांतता प्रस्थापित झालेली नाही. दरम्यान, फेब्रुवारी २०२२ मध्ये जेव्हा या युद्धाला तोंड फुटले होते, तेव्हा काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर सडकून टीका केली होती. मात्र आता थरूर यांनी रशिया आणि युक्रेनबाबतचा आपला अंदाज चुकल्याचे सांगत तेव्हा मोदी सरकारने घेतलेली भूमिका योग्य होती, असे विधान केले आहे. तसेच आपण तेव्हा घेतलेल्या भूमिकेबाबत खेद वाटत असल्याचेही थरूर यांनी म्हटले आहे.
तीन वर्षांपूर्वी २४ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरु झालेल्या रशिया-युक्रेन युद्धासंदर्भातील भारताच्या भूमिकेवर शशी थरूर त्यावेळी संसदेमध्ये म्हणाले होते की, "रशिया आपला मित्र आहे आणि त्यांचे सुरक्षेबाबतचे काही प्रश्न असतील. मात्र रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारतानं अचानक मौन बाळगणं हे युक्रेन आणि त्यांच्या समर्थकांसाठी निराशाजनक असेल. भारताने या मुद्द्यावर मौन बाळगणं हे दुर्दैवी आहे." दरम्यान, आता तीन वर्षांनंतर शशी थरूर यांनी तेव्हाच्या परिस्थितीबाबतचा आपला अंदाज चुकल्याचे आणि भारत सरकारने तेव्हा घेतलेली भूमिका योग्य होती हे कबूल केले आहे. नवी दिल्लीत सुरु असलेल्या रायसीना संवाद २०२५च्या सत्रादरम्यान बोलताना ते म्हणाले की,"आता तीन वर्षांनंतर मला माझ्या त्यावेळच्या भूमिकेबाबत खूप खेद वाटत आहे. मी तेव्हा जी भूमिका घेतली होती ती योग्य नव्हती. फेब्रुवारी २०२२ मध्ये संसदेत झालेल्या चर्चेवेळी भारत सरकारच्या भूमिकेवर टीका करणारा मी एकमेव व्यक्ती होतो."
पुढे बोलताना ते म्हणाले, "रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण हे संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याचे उल्लंघन असल्याचे मी म्हटले होते. सीमारेषांची अखंडता आणि युक्रेनच्या सार्वभौमत्वाच्या तत्त्वाचे उल्लंघन झाल्याचे मी म्हटले होते. आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्यासाठी बलप्रयोगाचा वापर आपण कायमच अस्वीकारार्ह मानत आलो आहोत. या युद्धामध्ये या सर्व तत्त्वांचे उल्लंघन झाले असून, आपण त्याचा निषेध केला पाहिजे, अशी मागणी मी तेव्हा केली होती. मात्र तीन वर्षांनंतर आता असे वाटत आहे की मी त्यावेळी चुकीचा होतो. आज भारताकडे असे पंतप्रधान आहेत जे दोन आठवड्यांच्या अंतराने युक्रेन आणि रशियाच्या राष्ट्रपतींची गळाभेट घेऊन मैत्रीचे संबंध प्रस्थापित करत आहेत. या धोरणामुळे भारत कायमस्वरूपी शांततेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभवू शकतो", असेही थरूर म्हणाले.