परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाश्चात्त्य देशांना सुनावले
19-Mar-2025
Total Views | 11
नवी दिल्ली: ( External Affairs Minister Jaishankar on Western countries ) परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रायसीना डायलॉगमध्ये पाश्चात्य देशांच्या दुटप्पी धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. काश्मीर आणि अफगाणिस्तानच्या मुद्द्यांवर पाश्चात्य देशांच्या ढोंगी वृत्तीवर त्यांनी टीका केली.
ज्याप्रमाणे सरकारे त्यांच्या देशात सुव्यवस्था राखण्यासाठी काम करतात, तसेच जागतिक पातळीवरही घडले पाहिजे. जयशंकर यांनी पाश्चात्य देशांच्या, विशेषतः ग्लोबल साउथ (विकसनशील देश) संबंधित बाबींमध्ये, ढोंगी धोरणाचे उदाहरण देताना, भारतीय भूमीवर पाकिस्तानने केलेला हल्ला किंवा घुसखोरी पाश्चात्य देशांनी प्रादेशिक वादात कशी बदलली हे सांगितले. काश्मीरवरील पाकिस्तानच्या आक्रमकतेचे राजनैतिक वादातून रूपांतर करण्यात पाश्चात्य देशांच्या भूमिकेवर त्यांनी टिका केला. ते म्हणाले, भारताने एका हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्रांकडे दाद मागितली होती. मात्र, त्याचे रुपांतर वादात करण्यात आले आणि हल्लेखोर आणि पीडित व्यक्तीला समान दर्जा देण्यात आला. यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, ब्रिटन आणि अमेरिका हे दोषी होते, असेही परराष्ट्र मंत्री म्हणाले.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी काश्मीर मुद्द्यावर पाश्चात्य देशांच्या भूमिकेवर आक्षेप व्यक्त केला. ते म्हणाले की, भारतातील जम्मू-काश्मीर आणि लडाख हे प्रदीर्घ काळापासून परकीय शक्तीच्या बेकायदेशीर ताब्याखाली आहेत. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पाकिस्तानने जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या काही भागांवर हल्ला करून त्यांचा ताबा घेतला. त्याच वेळी, १९५० आणि १९६० च्या दशकात चीनने या भागावर कब्जा केला, याची आठवण करून दिली.