"मी अल्पसंख्याक असूनही भारतात सर्वात सुरक्षित...'' भारताविषयी नेमक काय म्हणाला जॉन अब्राहम? जरूर वाचा...!

    17-Mar-2025
Total Views | 28
 
bollywood actor john abraham i feel the safest in india
 
 
 
मुंबई : बॉलिवूड स्टार जॉन अब्राहम केवळ पडद्यावरच नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही आपल्या भारतीय ओळखीचा अभिमान बाळगतो. सध्या आपल्या नवीन चित्रपट द डिप्लोमॅटच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या जॉनने भारतातील सुरक्षितता, धर्म आणि राजकारण याविषयी मत व्यक्त केले.
 
 
"मी भारतात पूर्णपणे सुरक्षित"
टाइम्स ग्रुपच्या ग्रुप एडिटर-इन-चीफ नविका कुमार यांना दिलेल्या मुलाखतीत जॉनला विचारण्यात आले की, "भारतामध्ये अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत" या चर्चेवर त्याचे काय मत आहे? यावर जॉनने उत्तर दिले, "बहुतेक लोक म्हणतील की मी अभिनेता असल्यामुळे माझे अनुभव वेगळे असतील. पण मी एक अल्पसंख्याक आहे. माझी आई झरथोस्ती (पारशी) आहे, तर वडील सिरियन ख्रिश्चन आहेत. तरीसुद्धा मला माझ्या देशात अत्यंत सुरक्षित वाटते."
 
 
तो पुढे म्हणाला, "माझ्या देशावर माझे नितांत प्रेम आहे आणि येथे मला कोणताही धोका वाटत नाही. काही लोक आपल्या स्वार्थासाठी अशा मुद्द्यांचा गैरफायदा घेतात, पण मी जिवंत उदाहरण आहे की भारतात अल्पसंख्याकही सुरक्षित आहेत. कदाचित मी अशा अल्पसंख्याक गटातून येतो, ज्यांच्याशी कोणालाही काही समस्या नाही. कोणाला पारशी समाजाबद्दल त्रास असू शकेल का?"
 
 
"मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे"
आपल्या ओळखीबाबत बोलताना जॉन म्हणाला, "मला या देशात राहण्याचा अभिमान आहे. मी भारतीय असल्याचा मला खूप अभिमान वाटतो. खरं सांगायचं तर, माझ्याइतका भारतीय कोणीही नसेल, अशी भावना माझ्या मनात आहे. मला नेहमीच वाटतं की मी भारतीय ध्वजाचा अभिमानाने झेंडा मिरवतो."
 
 
'द डिप्लोमॅट' विषयी माहिती :
शिवम नायर दिग्दर्शित द डिप्लोमॅट हा सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे. यात जॉन अब्राहमसोबत सादिया खतीब, कुमुद मिश्रा आणि शारिब हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट भारतीय राजनयिक जे.पी. सिंग यांच्या एका महत्त्वाच्या मोहिमेवर आधारित आहे.
 
 
कथानकात, सादिया खतीबने साकारलेल्या उज़्मा अहमद या भारतीय महिलेची कहाणी दाखवली आहे, जिला पाकिस्तानमध्ये जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडले जाते. तिच्या सुटकेसाठी जॉन अब्राहमचा पात्र असलेला भारतीय राजनयिक प्राण पणाला लावतो. हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवत आहे!
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..