मुंबई : "भारतामध्ये परिवर्तनाच्या चळवळी मध्यमवर्गाने सुरू केल्या होत्या, परंतु याच मध्यमवर्गाने आता या सामाजिक चळवळी गिळंकृत केल्या आहेत" असा दावा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केला आहे. ज्येष्ठ लेखक अशोक बेंडखळे यांच्या ' ५१ नामवंतांची भाषणे' या पुस्तक प्रकाशानाच्या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कवयित्री नीरजा, संधिकाल प्रकाशनाचे अरविंद जोशी, वांद्रे येथील नॅशनल लायब्ररीचे विश्वस्त प्रमोद महाडिक आदि मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर मध्यम वर्गावर टीका करताना पुढे म्हणाले की " पूर्वीच्या काळी भारतातील मध्यमवर्गाने परिवर्तनाचा विचार मांडला होता. आत्ताच्या घडीला मात्र आपली मुलं परदेशात कशी सेटल होतील याची चिंता या वर्गाला लागली आहे."
नॅशनल लायब्ररी, वांद्रे आणि संधिकाल प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ लेखक अशोक बेंडखळे संपादित ५१ नामवंतांची भाषणे या पुस्तकाचे प्रकाशन दि. १५ मार्च रोजी वांद्र्याच्या नॅशनल लायब्ररी येथे पार पडलं. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन पार पडलं. यावेळी या पुस्तकाचा परिचय करून देताना नीरजा म्हणाल्या " मराठी साहित्यामध्ये भाषणांचे संकलन फार कमी वाचायला मिळते. अशोकजी यांनी अत्यंत मोलाचा ऐवज मराठी वाचकांच्या हाती सोपवला आहे. या पुस्तकात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या भाषणांचा समावेश आहे. हे पुस्तक जास्तीत जास्त शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पोहोचायला हवे. अशा पुस्तकांमुळे समाजात जागृती निर्माण होते." पुस्तक निर्मितीचे अनुभव सांगताना अशोक बेंडखळे म्हणाले की या पूर्वी लिहिलेल्या ५१ भाषणांच्या त्यांच्या पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या पुस्तकाच्या पुढच्या भागाच्या लेखनाचा विचार केला. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचे हे विचार मौलिक असून, आपल्यासाठी आज सुद्धा ते मार्गदर्शक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.