पोलिसांवरही दगडफेक; खालापुरात शेकडो धर्मांधांविरोधात गुन्हे दाखल
14-Mar-2025
Total Views | 13
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Gorakshak Khalapur) गोरक्षकांवर इस्लामिक कट्टरपंथींच्या जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना खालापूर तालुक्यातील मौजे हाळ येथे घडली. गुरुवार, दि. १३ मार्च रोजी रात्री १२.४५ च्या सुमारास मौजे हाळ या मुस्लिमबहुल गावातील १०० ते १५० कट्टरपंथींनी हातात लाकडी दांडके व दगड घेवुन गोरक्षकांवर आणि पोलिसांवर हल्ला केला. यात काही महिला व अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. सुदैवाने गोरक्षक आणि पोलीस जमावाच्या तावडीतून सुटले, त्यानंतर जमावाने नजीकच्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली. सदर प्रकरणी एकूण ६० ते ७० जणांविरोधात खालापूर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, युकेज् रिसॉर्ट जवळील शेतातून एका टेम्पोमध्ये दोन बैल भरून ते हाळ गावामध्ये घेवुन जात असताना गोरक्षक यांनी पकडले. त्याबाबत खालापूर पोलीस ठाण्याकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच शेतामध्ये काही लोकांच्या संशयास्पद हालचाली तेव्हा दिसून आल्याने गोरक्षकांनी पोलीस मदत हवी असल्याचे त्यांनी कळविले. गोरक्षकांनी पुढे शेतामध्ये शोध घेतला असता दोन बैल व एक गाय असे झुडपामध्ये बांधून ठेवलेली दिसून आली, तसेच एक बैल पडीक खोलीमध्ये बांधुन ठेवलेला होता. त्यासोबतच एका खड्ड्यामध्ये जनावरांची कत्तल करून त्या जनावरांचे मांस, कातडी, शिंगे असे टाकलेले दिसून आले. यावरून बांधून ठेवलेले गाय व बैल कत्तलीकरीता आणले असल्याची गोरक्षकांची खात्री झाली.
पोलिसांच्या मदतीने जेव्हा सदर प्रकार उघडकीस येत होते, तेव्हा गावातील कट्टरपंथी जमावाने हातात लाकडी दांडके व दगड घेत पोलीस आणि गोरक्षकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. यामध्ये अनेक गोरक्षकांना शारीरिक दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. त्या जमावामध्ये समीर सय्यद, मुर्तुजा मेटकर, जावेद लियाकत सोंडे, कादीर लतीफ कर्जीकर, रियाज जळगावकर, उस्मान जळगावकर, समीर दुस्ते, मुजफ्फर कर्जीकर, मोज्जम मांडलेकर, मुजीब जळगावकर, आसिफ बेडेकर व इतर असे सामील होते.
या सर्वांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०९, १३२, १२१ (१), ११८ (१), १८९, १८९ (२), १८९(३), १८९ (४), १८९ (५), १९०, १९१(१) यासह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारणा अधिनियम २०१५) चे कलम ५,९,११ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी ६ लोकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित आरोपींविरोधात लवकरच कारवाई होण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.