सर्वांत आधी ‘भारती एअरटेल’ त्यानंतर ‘जिओ’ या दोन्ही कंपन्यांनी एलॉन मस्क यांचे बोट धरून, ‘स्टारलिंक’ला भारतात आणणार असल्याची घोषणा नुकतीच केली. भारतात ‘६जी’ आणण्याची प्रक्रिया सुरू असताना, नेमके ‘स्टारलिंक’ आल्याने काय होणार? त्याबद्दलचा हा सविस्तर आढावा...
फार जास्त नाही, कोरोनाआधीचा काळ आठवा. ज्यावेळी भारतीय टेलिकॉम क्षेत्रात, ‘जिओ’ने खळबळ उडवून दिली होती. दररोज एक जीबी मोबाईल डेटा, प्रत्येकाला वर्षभर देण्यात आला. त्यानंतर इंटरनेटच्या दुनियेत झालेली क्रांती आपण पाहातच आहोत. यानंतर लगेचच ‘कोविड’ महामारी आली आणि संपूर्ण देशभरातील जनता लॉकडाऊनमध्ये अडकली. पण या काळात, मोबाईल फोन सुरू होते. अनेक कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ दिले. या काळात मोठ्या प्रमाणावर मागणी झाली, ती वायफाय आणि थेट इंटरनेटजोडणी करण्याची.
मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये, घरोघरी इंटरनेंट, केबल पोहोचविण्याची मागणी वाढू लागली. अर्थात, काही काळानंतर ‘कोविड’चा विळखा तुटला, ‘वर्क फ्रॉम होम’ही बंद झाले, काहींचे अपवादात्मक अद्यापही सुरू आहेत. पण मग इंटरनेटची मागणी कमी झाली का? तर नाही. ग्राहकांना एव्हाना वेगवान इंटरनेट वापरण्याची सवय लागली होती. त्यातच ओटीटी प्लॅटफॉर्म, निव्वळ मनोरंजन करणार्या ऑनलाईन अॅप्सची चलती झाली. टीव्ही, इंटरनेटशी जोडला गेला. जुन्या टीव्हीची जागा, स्मार्ट टीव्हीने घेतली. परिणामी, नवनवीन आशय आणि आशयनिर्मिती करणार्यांचा, महापूर येऊ लागला. नवे-जुने सिनेमे इंटरनेटवर उपलब्ध होऊ लागले.
‘एअरटेल’, ‘जिओ’ आणि ‘स्टारलिंक’ यांच्यात आता करार होऊ घातला आहे. ‘स्टारलिंक’ आता भारतात येणार आहे. मुळात ‘स्टारलिंक’ म्हणजे काय? तर एक ध्येयवेडा उद्योगपती एलॉन मस्कने तयार केलेले एक उत्पादन. मुळात ते काय आहे, ते समजून घेऊया. रात्रीच्या वेळेस, एखाद्या तारकांचा समूह रांगेत आकाशातून जाताना दिसतो. खरे म्हणजे, ही काही खगोलीय घटना नव्हे, तर उपग्रह अवकाशात कुठल्याही हार्डवेअरविना एकमेकांशी जोडलेले असतात. याच उपग्रहांद्वारे इंटरनेट आपल्या घरांपर्यंत पोहोचले जाते. विशेष म्हणजे, तसे करण्यासाठी फक्त एका चौकोनी आकाराच्या डिश सदृश्य उपकरणाची गरज असते. ज्यावेळी डिशला इंटरनेटची गरज असते, तेव्हा थेट सिग्नलद्वारे स्टारलिंक सॅटेलाईट लेझर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधतात. सॅटेलाईटद्वारे इंटरनेटचे ग्राऊंड स्टेशन शोधले जाते. त्यानंतर डिशद्वारे इंटरनेट पोहोचवले जाते. इथे कुठल्याही प्रकारे केबलची आवश्यकता नसते. हा सर्व खेळ अर्ध्याहून कमी सेकंदात पूर्ण होतो. थेट तुमच्या मोबाईल, लॅपटॉपला इंटरनेट जोडणी सहज करता येते. इतका सोपा विषय आहे.
‘स्टारलिंक’च्या तंत्रज्ञानाद्वारे, इंटरनेट भारताच्या गावाखेड्यापर्यंत दुर्गम भागांपर्यंत सहज पोहोचणार आहे. आपल्या घरातील इंटरनेट वायफायचा वेग, हा किमान दहा जीबी प्रतिसेकंद इतका असतो. तो जास्तीत जास्त साडेचार जीबी प्रतिसेकंदांपर्यंत जाऊ शकतो. शिवाय, हा वेग, केबल इंटरनेटचा वेग हा ४०० जीबी प्रतिसेकंद इतकाही असू शकतो. साधारणतः अंदाज लावायचा झाला, तर हा वेग सध्या घरोघरी सुरू असलेल्या वायफाय वेगापेक्षा नक्कीच जास्त असणार आहे.
‘स्टारलिंक’ दोन प्रकारचे डिव्हाईस भारतात आणू शकते, ज्यात एक म्हणजे डिश स्वरुपात असणारे मोठे डिव्हाईस, मोठे उपकरण असले, तरीही एखाद्या बॅगमध्ये मावेल इतका आकार असणार आहे. दुसरे म्हणजे मिनी डिव्हाईस, हे उपकरण त्यापेक्षाही छोटे असणार आहे. घराच्या छतावर कुठल्याही ठिकाणी लावल्यानंतर, वेगवान इंटरनेट उपलब्ध होणार आहे. भारतातील काही भाग आणि कौशल्यगुण, अद्यापही केवळ संधी न मिळाल्याने मागे राहिला. दर्याखोर्यांचा असलेल्या आपल्या देशात, प्रत्येक गावाखेड्यात इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्क उपलब्ध आहेच, अशी गोष्ट नाही. बर्याचदा कडेकपार्यांतील दुर्गम भागांत, दळणवळणाची अडचण येते.
गावाखेड्यांपर्यंत विनाअडथळा इंटरनेट आणि इतर पायाभूत सुविधा पोहोचल्या, तर बर्याच अडचणी दूर होऊ शकतात. मागे एकदा हिमाचलला प्रवासाला गेलो होतो, तेव्हा एक महिला दुकानदार आम्हाला भेटली. आम्ही मुंबईकर म्हटल्यावर तिने कुतुहलाने आम्हाला विचारले. मुंबईतल्या तिच्या आठवणी तिने सांगितल्या. बोलता बोलता कळले की, तीही एका अमेरिकन कंपनीत रात्रपाळीचे काम करते. दिवसभर तिचे दुकान चालवते आणि रात्री ‘वर्क फ्रॉम होम’. अर्थात, हिमाचलच्या कडाक्याच्या थंडीत काम करणे, तसे आव्हानच आहे. परंतु, हे उदाहरण किंवा नमुना म्हणून घेतले, तर कितीतरी प्रश्न सुटण्यासारखे आहेत.
आजही बर्याच अमेरिकन मुख्यालय असलेल्या कंपन्या, भारतातही कर्मचार्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ सुरूच आहे. बर्याचदा पुणे-मुंबईसारख्या शहरांत, गावाकडून आलेली मंडळी याच ठिकाणी कार्यरत असतात. त्यांच्यासाठी जर इतक्या वेगवान इंटरनेट सुविधा गावातच उपलब्ध झाल्या, तर ही मंडळी त्यांच्याच घरी राहून कामे करू शकणार नाहीत का? तर हे सहज शक्य आहे. पुण्या-मुंबईत अवास्तव असलेले घरभाडे किंवा गगनाला भिडलेल्या घरांच्या किंमती, त्यात कर्जाचा हप्ता, असे अनेक प्रश्न सुटू शकतात. शिवाय, अशा मंडळींना कामासोबतच फिरस्तीचा छंदही जोपासता येऊ शकतो.
गावाखेड्यातील इंटरनेटच्या सुविधेमुळे अनेक संधी उपलब्ध होतील. ऑनलाईन व्यवहार सुलभ होतील. महाराष्ट्रातील गडचिरोली, अमरावतीसारखे भाग मुख्य पटलावर येतील. भारतातील पूर्वोत्तर शहरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, डिजिटल कवाडे खुली होतील. ‘कलम ३७०’नंतर सुख-शांतता नांदत असलेल्या काश्मीरच्या दुर्गम खोर्यांतही, इंटरनेट सहज उपलब्ध होऊ शकेल. अनेक नव्या स्वयंरोजगाराच्या, प्रशिक्षणाच्या संधींची द्वारे खुली होतील. अर्थात हा बदल काही एका रात्रीत होणारा नाही. परंतु, ज्या प्रकारे प्रत्येक भारतीयाच्या हाती मोबाईल फोन पोहोचला, त्याचप्रकारे त्यात वेगवान इंटरनेटही पोहोचेल आणि नव्या बदलांची सुरुवात नक्की होईल.