शिवसेनेमध्ये कुणीही नाराज नाही, कुटूंबाप्रमाणे एकत्रित राहून काम करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण

    21-Dec-2024
Total Views | 34
Eknath Shinde

नागपूर : शिवसेना ही एका परिवाराप्रमाणे असून पक्षात कुणीही नाराज नाही असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी दिले. एखादे पद मिळाले नाही तर माणूस म्हणून वाईट वाटणे साहजिक आहे, काहीजणांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या, मात्र याचा अर्थ कुणी नाराज आहे असे नाही. आज नाराजी व्यक्त केलेले तिन्ही आमदार माझ्या सोबत असून त्यांच्यापैकी कुणीही नाराज नाही. यापुढेही सगळेजण मिळून शिवसेनेमध्ये एकत्र राहून पक्षवाढीसाठी काम करणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे काही आमदार नाराज झाले होते. विजयबापू शिवतारे, नरेंद्र भोंडकर आणि प्रकाश सुर्वे यांनी यानंतर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. यानंतर उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी या तिघांना भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. आज विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पत्रकार परिषद घेऊन शिंदे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलताना, सरकार म्हणून काम करताना काही वेळा पदे येतात आणि जातात, मंत्रिपदापेक्षा आमच्यातील जिव्हाळ्याचे नाते महत्वाचे आहे. जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद वाटते त्याचप्रमाणे विजयबापू शिवतारे यांना एकनाथ शिंदे यांचा विश्वासू सहकारी हे पद महत्वाचे आहे असे त्यांनी मला सांगितले. आम्ही सारे शिवसेना नावाच्या कुटूंबाचा भाग असून या परिवारापासून कुणीही वेगळे होणार नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले. आज इथे नाराजी व्यक्त केलेले तिन्ही आमदार उपस्थित असून यापुढेही ते पक्षवाढीसाठी एकत्रितपणे काम करतील असे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

कल्याणमधील घटनेत शिवसेना मराठी कुटूंबाच्या पाठीशी

कल्याणमधील सोसायटीत मराठी कुटूंबासोबत घडलेल्या घटनेत शिवसेना मराठी कुटूंबाच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित केले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणी कसे रहावे आणि काय खावे यावर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही तसे करणे हे त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी लढायला कटिबद्ध असून कुणी शिवीगाळ करून मराठी कुटूंबावर हल्ला केला तर शिवसेना ते कदापि खपवून घेणार नाही असे शिंदे यांनी निक्षून सांगितले.

बीड येथील घटनेत कुणालाही पाठीशी घालणार नाही.

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ही अत्यंत अमानुष असून माणुसकीला काळिमा फासणारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत आज सभागृहात विस्तृतपणे आपले म्हणणे मांडले आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असून तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेतील पीडित कुटूंबाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. या प्रकरणातील आरोपी कितीही मोठा असला आणि कुणाच्याही जवळचा असला तरीही त्यांना पाठीशी घातले जाणार नाही असे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..