कशासाठी? पोटासाठी की जीवघेण्या कामासाठी???

    07-Nov-2024
Total Views | 58
 
 
CA young woman Death
 
पुणे येथील अ‍ॅना सॅबस्टियन पेरियली या २६वर्षीय सीए तरुणीचा अतिकामाच्या तणावामुळे झालेला मृत्यू हा देशभरात चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर अशाच आणखीन काही घटना अलीकडच्या काळातही समोर आल्या आहेत. त्यानिमित्ताने मोठ्या कंपन्यांमधील अमानवीय कार्यशैली, व्यवस्थापनाच्या कर्मचार्‍यांकडून अवाजवी मागण्या आणि एकूणच ‘कॉर्पोरेट कल्चर’च्या नावाखाली गाठलेला असंवेदनशीलचा कळस, यांमुळे हे सगळे कशासाठी? पोटासाठी की जीवघेण्या कामासाठी? असाच प्रश्न उपस्थित होतो.
 
अ‍ॅना सॅबस्टियन पेरियली या पुणे येथे काम करणार्‍या युवा महिला कर्मचाऱ्याच्या अकल्पित व अचानक झालेल्या दुर्दैवी मृत्यूची उद्योग-व्यापार व व्यवस्थापन क्षेत्रात विविध स्वरुपांत काळजीयुक्त चर्चा अजूनही सुरु आहे. असे होणे स्वाभाविकच. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, २६वर्षीय व ‘सीए’ म्हणजेच चार्टर्ड अकाऊंटन्टसारखी प्रथितयश व्यवस्थापन पात्रता प्राप्त केलेल्या अ‍ॅनाने दि. १८मार्च रोजी आपली कारकीर्द मोठ्या उत्साह व उमेदीसह सुरु केली व दि. 20 जुलै रोजी त्यांचा अकल्पित मृत्यू झाला.
वर नमूद केल्याप्रमाणे उणेपुरे चार महिने एवढी अल्प कारकीर्द लाभलेल्या अ‍ॅना सॅबस्टियन पेरियली यांचा झालेला धक्कादायक मृत्यू व त्याची कथित व तेवढीच दुर्दैवी पार्श्वभूमी उजेडात आली ती अ‍ॅनाच्या आई अनिता ऑगस्टाईन यांनी अ‍ॅनाने आपली कारकीर्द व त्यानंतर अल्पावधीत म्हणजेच सुमारे चार महिन्यांत ज्या पार्श्वभूमीवर अ‍ॅनाचा मृत्यू झाला, त्यासंदर्भात अ‍ॅना काम करणार्‍या ‘अर्नस्ट अ‍ॅण्ड यंग’ या प्रथितयश व्यवस्थापन कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांना लिहिलल्या ईमेलमुळे.
 
अ‍ॅनाच्या आई अनिता यांनी ‘अर्नस्ट अ‍ॅण्ड यंग’चे अध्यक्ष राजीव मेमानी लिहिलेल्या ई-मेलमध्ये आपल्या तरुण मुलीच्या मृत्यूची घटना व दुर्दैवी प्रसंग हा कंपनी व्यवस्थापनासाठी जागृत होऊन व कंपनीच्या कामकाज आणि कार्यपद्धतीवर मुळातून फेरविचार करण्याची कळकळीची विनंती केली आहे. अनिता व कंपनीचे अध्यक्ष यांदरम्यान झालेले ईमेलचे आदान-प्रदान व त्यावर झालेली साधकबाधक चर्चा याचा तपशील समाजमाध्यमांवर उपलब्ध झाला व त्यातून उद्योग-व्यवसायाशी संबंधित समाजमाध्यमेच नव्हे, तर संपूर्ण समाजमनच ढवळून निघाले व त्याचे शोकांतिक व तेवढेच चिंतनीय परिणाम सर्वदूर दिसून आले, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
 
अनिता ऑगस्टिन यांनी आपल्या ईमेल पत्राच्या सुरुवातीलाच अ‍ॅनाला कराव्या लागणार्‍या तणावग्रस्त व अतिरिक्त कामाचा उल्लेख केला असून, अ‍ॅनाला याच कार्यपद्धतीचा कठोर सामना करावा लागला, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी याचसंदर्भात पुढे नमूद केले की, हा मुद्दा वा कार्यपद्धती ही कंपनीअंतर्गत विशिष्ट विभाग वा व्यवस्थापकाशी संबंधित नसून ही कार्यपद्धती आता अख्या व्यवस्थापनाशी संबंधित असा गंभीर मुद्दा बनली आहे.
 
त्यानंतर अनिता यांनी नमूद केलेला मुद्दा म्हणजे अ‍ॅनाच्या मृत्यूनंतर पुणे येथे झालेल्या अंत्यसंस्कारावेळी पुणे कार्यालयात काम करणार्‍यांपैकी कुणीही उपस्थित नव्हते. आपल्या मुलीच्या अकल्पित निधनानंतर त्यांना ही बाब अधिक दुःखद वाटली व साहजिकच खटकली. आपल्या मनातील हे दुःख व भावना कंपनी व व्यवस्थापनाला कळवाव्या, म्हणून अनिता यांनी कंपनी व्यवस्थापकांची भेट घेतली. मात्र, त्यांना व्यवस्थापन तर दूर,पण कंपनी व्यवस्थापकांकडूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. ‘जी कंपनी कामकाज व कार्यशैलीसंदर्भात मूल्यांवर भर देणारी असल्याचे सांगण्यात येते, अशा कंपनी वा तिच्या व्यवस्थापकांकडून माझ्यासारख्या आईने अशी अपेक्षा ठेवणे गैर आहे का?’ असा सवाल त्यांनी यासंदर्भात उपस्थित केला व तो प्रत्येकाला विचार व अंतर्मुख करायला लावणारा ठरतो.
 
अनिता यांच्या ईमेल पत्राला उत्तर वा प्रतिसाद म्हणून ‘अर्नस्ट अ‍ॅण्ड यंग-इंडिया’चे अध्यक्ष राजेश मेमानी यांनी कंपनीच्या सर्व कर्मचार्‍यांशी ईमेलद्वारा संवाद-संपर्क साधला. हे त्यांचे पत्र समाजमाध्यमांमध्ये उपलब्ध आहे. या पत्रात राजेश मेमानी यांनी सुरुवातीलाच नमूद केल्यानुसार “मी आपल्या दिवंगत सहकार्‍याच्या कुटुंबाला माझी श्रद्धांजली व संवेदना कळविल्या आहेत. कुटुंबाचे झालेले नुकसान कधीही न भरुन निघणारे आहे. मात्र, आमच्यापैकी कुणीही अ‍ॅनाच्या अंत्यविधीला उपस्थित नव्हते, याचा मला खेद आहे. व्यवस्थापनाची भूमिका म्हणून अशी बाब यापूर्वी झाली नाही व पुढेही होणार नाही.”
 
कंपनी कर्मचार्‍यांना केलेल्या या विशेष संवादपत्रात राजीव मेमानी यांनी मान्य केले होते की, गेल्या काही काळामध्ये आपल्यापैकी सर्वांनाच समाजमाध्यमांतील मजकुराचा सामना करावा लागला आहे. आमच्यासाठी प्रगत व प्रेरक कार्यपद्धतीची रचना करुन त्याची अंमलबजावणी करणे, याला नेहमीच प्राधान्य दिले गेले आहे.
 
राजीव मेमानी यांनी याच मुद्द्यावर भर देत स्पष्ट केले की, त्यांच्यासाठी कंपनी कर्मचार्‍यांचे कल्याण सर्वोपरी राहिले आहे. मी या मुद्द्याला अधिक प्राधान्यतत्वावर घेणार असून मी त्याची अंमलबजावणी माझे स्वतःचे उद्दिष्ट म्हणून स्वीकारले आहे. या अंमलबाजवणीची उद्दिष्टपूर्ती झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाहीदेखील राजीव मेमानी यांनी याच पत्रात विशेषत्वाने दिली, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
 
दरम्यान, अ‍ॅनाच्या दुर्दैवी व अकाली मृत्यूची नोंद घेत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यम व त्याच्याच जोडीला समाजमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली. या चर्चेमध्ये प्रामुख्याने विशेष व्यवसायक्षेत्रात काम करणारे प्रोफेशनल्स व व्यवस्थापन क्षेत्रातील व्यवस्थापकांना प्रसंगी दिवसातील १२ते १४तास काम करावे लागून त्यांच्या आरोग्य व आयुष्याकडे पुरते दुर्लक्ष करावे लागत असण्यावर मोठी चर्चा झाली व त्याचे परिणाम सर्वदूर उमटू लागले.
 
याच व्यापक सामाजिक चर्चेचा एक भाग म्हणून अ‍ॅना ‘अर्नस्ट अ‍ॅण्ड यंग’ कंपनीमध्ये काम करीत असल्याने या कंपनीसह देशांतर्गत अन्य तीन प्रमुख व आघाडीच्या चार्टर्ड अकाऊंटन्सी कंपन्यांच्या कार्यशैली व कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठली. या टीकेतील मुख्य वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या जागतिक पातळीवरील प्रमुख अशा चार ‘सीए’ कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना रोजच्या कामाच्या तासांव्यतिरिक्त आठवडी सुट्टीच्या दिवशी काम करायला लावतात. आठवडी सुट्टीच्या दिवशी काम करण्याच्या बदल्यात पर्यायी रजा देत नसल्याने त्यांचे आरेाग्यचक्र कायमच बिघडलेले असते. याच जाहीर टीकेला जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार या मुख्य कंपन्यांच्या पाश्चिमात्य मुख्यालय वा तेथील कार्यालयांमध्ये मात्र अशी प्रथा-पद्धती नाही.
 
या कंपन्यांमध्ये नव्याने व आकर्षक पगार-फायद्यांसह दाखल झालेल्या युवा व्यवस्थापकांनी आपले नवे अनुभव जाहीरपणे जे मुद्दे नमूद केले आहेत, त्यानुसार त्यांना दररोज रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते व त्यामुळे रोजच झोप आणि आराम यांचा बट्ट्याबोळ होतो. वेळीअवेळी वरिष्ठांकडून ऑनलाईन मिटिंगचा तगादा लावला जातो. संबंधित व्यवस्थापकाची मनमानी व सोयीच्या वेळेनुसार काम करावे लागते. आपली स्वतःची रजासुद्धा घेता येत नाही. वरिष्ठांच्या सर्वस्वी मर्जीप्रमाणे नव्या कर्मचार्‍यांना वागावे लागते व काम करावे लागते. या नव्या अधिकारी-व्यवस्थापकांना अशक्यप्राय असणारी कामे दिली जातात. परिणामी, त्यांना त्यांच्या पगारवाढीच्या न्याय्य व देय असणार्‍या अधिकारापासून हेतुपुरस्सर दूर ठेवण्यात येते व या सार्‍यांमुळे त्यांच्यावर काम आणि कामाशी संबंधित प्रचंड मानसिक ताणतणाव असतो.
 
या सार्‍याचाच प्रत्यक्ष परिणाम अ‍ॅनाच्या मृत्यूमध्ये झाल्याचा जो दावा तिच्या आईने केला, त्याला तरुण उमेदवारांनी जाहीर दुजोरा दिला आहे. त्यामुळे मूळ प्रश्न कायम राहतो की, हे सारे काम कशासाठी? पोटासाठी की जीवघेण्या कामासाठी?
 
दत्तात्रय आंबुलकर
अग्रलेख
जरुर वाचा
अनुराग कश्यपनं का सोडलं बॉलीवुड?

अनुराग कश्यपनं का सोडलं बॉलीवुड? 'ही' आहेत कारणं...

भारतीय चित्रपटसृष्टी पारंपारिकरित्या बॉलिवूडच्या वर्चस्वाखाली होती, परंतु सध्या दिग्दर्शक सर्जनशील स्वातंत्र्यासाठी या पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या बदलत्या प्रवृत्तीमुळे भारतीय सिनेमाच्या कथा सांगण्याच्या शैलीत होणाऱ्या बदलांबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील महत्त्वपूर्ण दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुराग कश्यप यांनी आपल्या असामान्य कथनशैलीसाठी आणि प्रस्थापित नियमांना धक्का देण्याच्या तयारीसाठी ख्याती मिळवली आहे. मात्र, अलीकडील घडामोडींमध्ये कश्यप बॉलिवूडपासू..

जर नाचला नाहीस तर तुझं निलंबन करेन; लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रतापचा उन्माद

"जर नाचला नाहीस तर तुझं निलंबन करेन"; लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रतापचा उन्माद

Tej Pratap बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे थोरले पुत्र आमदार तेज प्रताप यादव (Tej Pratap) यांचा एक व्हिडिओ शनिवारी व्हायरल होत आहे. ज्याच ते पूर्णपणेल होळी सणानिमित्त रंगात रंगून गेलेले दिसत आहेत. एका व्हिडिओत तेज प्रताप यांनी पोलिसाला नाचण्याचे आदेश दिले. संबंधित व्हिडिओत तेज प्रताप एका पोलीस कॉन्स्टेबलला आवाज देत आहे. अरे कॉन्स्टेबल मी गाणे वाजवतो, तुला त्यावर नाचावे लागेल. वाईट वाटून घेऊ नकोस, होळी आहे. जर नाचला नाहीस तर तुला मी निलंबित करेन, यावरून संबंधित पोलिसाने लाजेकाजे सर्वांसमोर ..