रायगड : महाड विधानसभा १९४ च्या वतीने भाजप विधानपरिषद गटनेते आणि रायगड लोकसभा क्षेत्राचे प्रभारी आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत सुपर वॉरीयर्स सोबत नुकतीच बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना येणाऱ्या काळात सुपर वॉरीयर्सना सोबत घेऊन महाड-पोलादपूरमधील सर्व निवडणुकांत आपण प्रचंड यश मिळवू, असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला.
यावेळी दरेकर म्हणाले की, "मला एक खंत होती इथे काही रुजेल का? पेरले तर उगवेल का? मला आता पूर्ण खात्री आहे याठिकाणी भविष्यात फक्त भारतीय जनता पार्टी उगवेल, अशा प्रकारचा विश्वास देणारा हा कार्यक्रम आहे. २२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहिले. ५०० वर्षाचा वनवास संपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे लोकार्पण झाले. राजकीय जीवनात मी २५-३० वर्ष काम करतोय. परंतु एवढ्या वर्षाच्या काळात सर्वात राममय झालेले वातावरण यापूर्वी कधीही पाहिले नाही, अशा प्रकारचे वातावरण देशात निर्माण झाल्याचे दरेकर म्हणाले."
ते पुढे म्हणाले की, "पक्ष वाढवायला वेगवेगळ्या गोष्टी लागतात त्यामध्ये वातावरण हा महत्वाचा भाग असतो. आज आपण सर्व बाजूने वरचढ आहोत. आपल्याकडे जगात लोकप्रिय असणारा नेता आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. कुठल्याही पक्षाकडे एवढा लोकाभिमुख नेता नाही जो आपल्याकडे आहे. आपला पक्ष हा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांची झोकून काम करणारी फळी ही खरी पक्षाची संपत्ती आहे आणि ती तुम्ही आहात, ते इतर पक्षाकडे नाही. आपल्याकडे प्रत्येक कार्यकर्ता वैचारिक अधिष्ठानावर उभा राहिलेला कार्यकर्ता आहे."
"मी जेव्हा फिरतो, लोकांमध्ये जातो तेव्हा केवळ उदघाटने करत नाही. तर जनतेच्या चेहऱ्याचे भाव टिपत असतो. जेव्हा फिरतो तेव्हा दिसते की या महाड-पोलादपूरच्या जनतेला भविष्यात भाजपा हवी अशा प्रकारचे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतात. अशा प्रकारचे चांगले चित्र आज झपाट्याने बदलताना दिसत आहे," असेही ते म्हणाले.
"या सरकारच्या माध्यमातून जेवढा विकास करता येईल तेवढा निश्चितपणे आपण करणार आहोत. हे सर्व करत असताना संघटन हा महत्वाचा भाग आहे. जे काही भविष्य घडवायचे आहे ते या वॉरीयर्स आणि प्रमुख लोकांच्या हातात आहे. आपल्याला वॉरीयर्स का केले, आपली जबाबदार काय? हे समजून घेऊन दोन-तीन बूथचे जे काही वॉरीयर्स आहेत त्यांनी त्या बूथवर आपले वर्चस्व कसे प्रस्थापित करता येईल याची काळजी घ्यावी. ज्या गावात विकासकामे करायची आहेत ती कामं आपण करू. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर ज्यांचा मोठ्या प्रमाणावर विश्वास आहे त्या सर्वांना आपल्या प्रवाहात घ्या, लाभार्थ्यांशी संवाद साधा," असे आवाहनही दरेकरांनी यावेळी सुपर वॉरीयर्सना केले.
आज याठिकाणी भाजपचा आमदार, खासदार नसला तरी माझे बारीक लक्ष महाड-पोलादपूरच्या सर्व विकासकामांकडे असणार आहे. सभागृहात मी महाड-पोलादपूरचे ५-६ विषय मांडले नाहीत असे एकही अधिवेशन गेले नाही. नुसते प्रश्न मांडले नाही तर त्या प्रश्नांची सोडवणूकही मी केली. २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल राज्य सरकारकडून मंजूर करून घेतले. पोलादपूर तालुक्यात आपण तालुका क्रीडा भवन उभे करतोय. येणाऱ्या काळात विकासासंदर्भात महाड, पोलादपूर, माणगावमध्ये मी स्वतः जातीने लक्ष देणार असल्याचेही दरेकरांनी उपस्थितांना सांगितले.
यावेळी दरेकरांनी उद्धव ठाकरेंवरही तोफ डागली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्यासारखे काही नाही. त्यांनी हातातून सर्व घालवले आहे. नाशिकच्या मेळाव्यात त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते एवढे भ्रमिष्ट झालेत की टीका आणि शिव्या देण्याशिवाय दुसरे कामचं करत नाहीत. जे सरकार असताना अडीच वर्ष घरात बसले ते पंतप्रधानांना सांगणार काम भरोसे व्हा राम भरोसे नको. अडीच वर्षाच्या कालावधीत तुमचे सरकार असताना तुम्ही काही केले नाही. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये टाकले. शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले आणि तुम्ही त्यांच्या अनुष्ठानाची अवहेलना करता. सगळे आता गर्भगळीत झालेत. काँग्रेसचे तर अस्तित्वच नाही. इतर पक्षातील ज्या चांगल्या लोकांना भाजपा भविष्य वाटत आहे, भाजपा हा समाजासाठी, जनतेसाठी कामं करू शकणारा पक्ष आहे, त्या सर्वांना मोठ्या मनाने आपल्या प्रवाहात घ्या, असे आवाहनही दरेकर यांनी केले.
विश्वासाचे वातावरण निर्माण करा
दरेकर म्हणाले की, आपल्या पक्षाला इतिहास आहे. दोन खासदारांवरून आपण ३०० च्यावर गेलो, येणाऱ्या निवडणुकीत आपण ४०० च्या वर जाणार आहोत. पूर्वी पक्षात कामं करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना माहित नव्हते की देशात सरकार बनवू, आमचे खासदार, आमदार येतील. परंतु ते हिंदुत्वाचा विचार, राष्ट्रवादाची भुमिका घेऊन एकनिष्ठेने कामं करत होते. त्याचे फळ आज उभे राहिले आहे. आपल्याला वातावरण चांगले आहे. केंद्रात-राज्यात सरकार आहे. तुम्हाला पाठबळ द्यायला आम्ही आहोत. त्यामुळे लोकांसाठी कामं केले पाहिजे. लोकांमध्ये तुमच्याविषयी विश्वास निर्माण झाला पाहिजे. सर्व पक्षांना संधी दिली आता बस झाले. आता आम्हाला केवळ भाजपा हवी, अशा प्रकारचे विश्वासाचे वातावरण निर्माण करा, असा मोलाचा सल्लाही दरेकरांनी वॉरीयर्सना दिला.
महाड-पोलादपूरच्या विकास कामासाठी नक्की वेळ देईन!
बिपीन म्हामुणकर नेहमी सांगतात भाऊ तुम्ही वेळ द्या. खरे आहे... पण पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. सहकाराचे, बँकेचे काम मोठे आहे. त्यामुळे अपेक्षित असतानाही मी वेळ देऊ शकत नाही. परंतु तुम्ही चांगले कामं सुरू केले आहे. कार्यकर्त्यांत ऊर्जा आहे. तुम्हाला १५ दिवसातून एखादा दिवस नक्की महाड-पोलादपूरच्या वेगवेगळ्या संघटनात्मक, विकासाच्या कामासाठी देईन, असा विश्वास दरेकर यांनी दिला.