नागपूर : विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे नागपूरमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तसेच मोरभवन बस स्थानकासह अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे,
अशा परिस्थितीत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आपत्कालीन परिस्थितीकरिता नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा पथक कार्यरत आहे. नागरिकांनी कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये ०७१२२५६७०२९ किंवा ०७१२२५६७७७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे मानद सचिव संदीप जोशी यांनी नागपूरातील स्थितीची माहिती दिली आहे. एनडीआरएफ, नागपूर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून बचाव कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ३५० लोकांचे रेस्क्यू करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत लोकांनी काळजी घ्यावी आणि याबाबत सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.