जळगाव : जळगावमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी आमदार मनिष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केली आहे. या कारवाईमुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे.
स्टेट बँकेकडून घेण्यात आलेल्या थकीत कर्जाज्या संदर्भात ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबादसह विविध जिल्ह्यातून ईडी पथकाच्या १० गाड्या एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.
ईडीने माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या जळगावसह नाशिकमधील एकूण सहा फर्मवर एकाच वेळी छापेमारी केली. सर्व ठिकाणाच्या फर्मवर असलेल्या मालमत्ता आणि कागदपत्रांची ईडीकडून तपासणी सुरु केली असल्याचे बोलले जात आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीचे एकूण ६० कर्मचारी आणि अधिकारी या कारवाईत सहभागी आहेत. दरम्यान सीबीआयने गेल्यावर्षीदेखील राजमल लखीचंद ज्वेलर्सचे चौकशी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.