आता शासकीय पत्रव्यवहारांत होणार शिवराज्याभिषेक बोधचिन्हाचा वापर!
25-Jul-2023
Total Views | 956
मुंबई : यंदा शिवराज्याभिषेकास ३५० वे वर्ष सुरू झाले असून, दुर्गराज रायगडावर सरकारकडून विविध कार्यक्रम झाले. महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी शिवराज्याभिषेकाचा सोहळा दिमाखात साजरा झाला. याच पार्श्वभुमीवर आता शासनातर्फे वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रचार व प्रसिद्धीसह शासकीय पत्रव्यवहारांत ३५० व्या शिवराज्याभिषेकानिमित्त साकारलेल्या विशेष बोधचिन्हाचा वापर करण्यात येणार आहे.
शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर लोकांच्या मनामनांत व्हावा, जगभरात जेथे मराठी माणूस आहे, तेथे छत्रपतींचा विचार तसेच त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी, हा या मागील उद्देश्य आहे. शासनाच्या कार्यक्रमांच्या प्रचार, प्रसिद्धीसह पत्रव्यवहारांत त्याचा वापर केले जाणार आहे. तसेच बोधचिन्ह शासकीय कार्यालयांत दर्शनी भागात चित्रित करण्याचा आदेश देण्यात आला आहे.