आता विकास सुस्साट आहे! सगळे स्पीडब्रेकर आम्ही हटवलेत!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोख उद्धव आणि आदित्य ठाकरेंकडे?
25-May-2023
Total Views | 78
रत्नागिरी : प्रशासन आणि सरकार ही दोन चाकं जर एका वेगाने धावली तर त्या गावाचा शहराचा विकास कुणी रोखू शकत नाही. आता पूर्वीच्यांसारखं स्पीडब्रेकर नाही. अडथळे नाहीत. सगळे अडथळे आम्ही काढून टाकलेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील सभेत लगावला. 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमातून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला. त्यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी मविआच्या कारभारावर प्रहार केला.
ठाकरेंनी केलेल्या फेसबूक लाईव्हवरुन कारभाराचाही त्यांनी समाचार घेतला. आमचं सरकार फेसबूक लाईव्हवर नाही. ग्राऊंड झिरोवर जाऊन काम करणारं आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले पण आम्ही बांधावर नाही तर शेतात जाऊन आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो वा आपले कृषीमंत्री अब्दुल सत्तार असो सर्वांनीच नेहमी शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतली. फक्त फेसबूकवरुन ऑनलाईन कारभार हाकलेला नाही. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोयं. उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहील, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.