वसई : साहित्य जल्लोष प्रतिष्ठान, वसई विरार शहर महानगरपालिका आणि गोन्सालो गार्सिया महाविद्यालय,वसई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकविसाव्या साहित्य जल्लोषच्या पूर्वसंध्येला शुक्रवार दि. ६ ॲाक्टोबर २०२३ रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची स्वरचित काव्यस्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये पालघर जिल्ह्यातील बोर्डी, डहाणू , चिंचणी, बोईसर, पालघर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, सफाळे तसेच वसई तालुक्यांतील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सर्व सहभागी विद्यार्थी कवींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले आणि परिक्षणाअंती निवड करण्यात आलेल्या निवडक विद्यार्थ्यांना ७ ॲाक्टोबर २०२३ रोजी होणाऱ्या “एकविसाव्या साहित्य जल्लोष" मधील मुख्य कविसंमेलनात स्वरचित कविता सादरीकरणाची संधी देण्यात येणार आहे.
काव्यस्पर्धेत एकूण ३० स्पर्धकांनी तर वक्तृत्व स्पर्धेत २० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यापैकी काव्यस्पर्धेत निधी मोरे, सुप्रिम मस्कर, साक्षी धवडेकर, रिबिका पांढरे,काजल वझे व किर्ती शिलेदार यांची निवड करण्यात आली. तर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक सुप्रिम मस्कर, द्वितीय क्रमांक स्वरा सावंत, तृतीय क्रमांक निधी मोरे आणि उत्तेजनार्थ पारितोषिक ईश्वरी मळम व परवीन बेग यांनी पटकावले.
काव्यस्पर्धेचे परिक्षण अक्षता देशपांडे आणि डॅा पल्लवी बनसोडे यांनी केले. तसेच वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षण डॅा सिसिलिया कार्व्हेलो आणि डॅा. नेहा सावंत यांनी केले. या कार्यक्रमाला गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाचे प्रशासक फादर राजेश लोपीस, प्राचार्य डॅा सोमनाथ विभुते, वसई विरार शहर महापालिकेचे ग्रंथालय विभाग उपायुक्त संघरत्ना खिल्लारे, आय प्रभाग उपायुक्त सागर घोलप, सहाय्यक आयुक्त ग्लिसन घोन्सालवीस तसेच साहित्य जल्लोषचे अशोक मुळे, संदेश जाधव, प्रकाश वनमाळी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमातील दोन्ही स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सुरेखा कुरकुरे, सुषमा राऊत , शिल्पा परुळेकर, मकरंद सावे,स्वाती जोशी ,वंदना वर्तक यांनी विशेष मेहनत घेत पार पाडली.