वर्धा :पहिल्या दिवसापासून शिंदे फडणवीस सरकार घटनाबाह्य म्हणणाऱ्या आदित्यच्या बापाचेच पद घटनाबाह्य ठरत आहे, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी दि. ११ जानेवारी रोजी केली आहे. आर्वी येथे भाजपच्या मेळाव्यास आले असताना ते बोलत होते. पक्षप्रमुखच घटनाबाह्य असल्याने सगळं घटनाबाह्य ठरते. सर्व घटनाबाह्य करत असताना तुम्हाला सरकारवर बोलण्याचा अधिकारच राहिला नाही, अशी टीका राणेंनी केली.
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाला मिळणार? याबाबत निकाल अजुन प्रलंबित असताना, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत ही २३ जानेवारीला संपणार आहे. २३ जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची ५ वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे ठाकरेंची डोकेदुखीत आणखी वाढ होणार आहे.
यावेळी नितेश राणे यांनी धनुष्यबाण हा मुळात बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आहे. ‘ईडी’ कुणाच्या घरी उगीच चहा घ्यायला जात नाही. माहिती मिळाल्यावर ते चौकशी करतात. भ्रष्टाचार नसेल तर थयथयाट करण्याची गरज नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना आमची घरे तोडली. चुकीच्या केसेस लावल्या, अटक केली.समाजमाध्यमांवरील पोस्टवरून नेत्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली. ते दोषी चालतात. आता ‘ईडी’ची चौकशी सुरू झाली तर थयथयाट करतात. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयास जे योग्य वाटते ते होते. त्यानुसार तारखा पडतात. त्यावर बोलणे उचित नाही, असे राणे यांनी सत्ता संघर्षावर न्यायालयात सुरू प्रक्रियेवर मतप्रदर्शन केले.
धनुष्यबाणावर सुनावणीला सुरुवात झाली असताना, जोपर्यंत सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे, तोपर्यंत निवडणूक आयोगात सुनावणी नको, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. यावर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी 'उद्धव ठाकरेंकडे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून असलेलं पद हे चूकीचं नाही, मात्र ज्याप्रकारे त्यांनी पक्षप्रमुख नात्याने पक्षाचे जे निर्णय घेतले ते चूकीचे आहे.', असा मोठा युक्तीवाद उपस्थित केला होता. या सर्व पाश्वभूमीवर राणेंनी उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.