
नाशिक: गेल्या पाच दिवसांपासून त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर नांदूरमध्यमेश्वर धरणातून सुमारे ४४ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.
गेल्या पाच दिवसात नाशिक शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. नाशिकच्या पश्चिम पट्टा असलेला इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तसेच सुरगाणा पेठ, दिंडोरी या भागात विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे गंगापूर, पालखेड, वाघाड, ओझरखेड, दारणा, मुकणे, आदी धरणाच्या साठ्यात झपाट्याने वाढ झालेली आहे. तसेच गंगापूर, दारणा या धरणातून विसर्गही करण्यात येत आहे. तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून मंगळवारी दि. १२ रोजी रात्री ८० हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी दि. १३ रोजी ६५२७५ क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. तर दुपारी बारा वाजेनंतर हा विसर्ग घटवून ४४७६८ इतका करण्यात आला आहे. सद्यस्थितीत नांदूरमध्यमेश्वर धरणांतून ४४७६८ विसर्ग करण्यात येत आहे.
०९ टीएमसीहुन अधिक विसर्ग
गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गोदावरीत तिसऱ्या दिवशीही पूर परिस्थिती कायम आहे. गोदावरीत आलेल्या पुरामुळे दरवर्षी चांदोरी, सायखेडा आदी नदी काठच्या गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता असते. यंदाही चांदोरी सायखेडा परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.