औरंगाबाद : बीड जिल्ह्यात पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत भाजपने वर्चस्व राखले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी निवडणूकीत बाजी मारली असून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना चांगलाच धक्का बसला आहे.
जानेवारी महिन्यात पाच नगर पंचायतीसाठीची निवडणूक पार पाडण्यात आली होती. यात एकूण तीन नगरपंचायतीत भाजपने बाजी मारली. त्यानंतर नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक घेण्यात आली असता यात पाटोदा शिरूरमध्ये भाजपने बाजी मारली. यावेळी नगराध्यक्षपदी सय्यद खतीजाबी सय्यद अमर यांची तर उपनगराध्यक्ष पदी शरद बांदळे यांची निवड झाली आहे.
नगरपंचायत निवडणूक निकालानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या की;
"लोकांनी भाजपला पहिली पसंती दिली आहे. सत्ता असूनही यश मिळवण्यात सत्ताधारी कमी पडले. ही लढत मुंडे विरुद्ध मुंडे अशी कधीच नव्हती. एका मतदारसंघाचं नेतृत्व आणि जिल्ह्याचं पालकत्व यात खूप मोठा फरक आहे. लोकांचा गेल्या अडीच वर्षातल्या कामकाजाचा राग आणि आमच्या काळातील कामकाजाची पावती; हे दर्शवणारा तो निकाल आहे. बीड जिल्ह्यात एकसंघ असा भाजप सोडून कोणताही पक्ष नाही. जे नेते आहेत ते एका भागापुरतेच आहेत. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असा विचार करणारा एकही नेता नाही."