नागपूर : गोंदिया जिल्ह्यात दिवसेंदिवस कमी होत असलेली सारस पक्षांची संख्या हा गंभीर विषय असून, सारस संवर्धन आणि संरक्षणासाठी तातडीने प्रयत्न करा तसेच ही संख्या कमी होण्यामागील कारणे काय आहेत, याचा अभ्यास करण्याचे निर्देश राज्याचे वनमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत .
सारस पक्षी संवर्धनासंदर्भात हरिसिंग वन सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सारस पक्षी संवर्धनासंदर्भात मानवी संवेदनशीलपणे विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. परिसरात होणाऱ्या अतिउच्च दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे तसेच शेतीमध्ये होणारा रासायनिक खतांचा, कीटक नाशकाचा वापर, घरट्यांना होणारे नुकसान या सर्वच बाबींवर बैठकीत चर्चेला आल्या.
यावेळी ना. मुनगंटीवार यांनी संबंधित सर्व विभागांशी समन्वय ठेऊन महावितरण, कृषी विभागाशी संबंधित अडचणींचा सूक्ष्म विचार करुन उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या. शेतात सेंद्रिय खतांचा वापर व्हावा यासाठी जागृती करता येईल का, सारस पक्षी मित्र तयार करुन त्यांना मानधन देता येईल का, यासाठी निधीचे योग्य नियोजन व्हावे, शासनाच्या आकस्मिक निधीतून अर्थसहाय प्राप्त करुन देता येईल का, अश्या महत्वाच्या विषयावर ना. सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.
सारस संवर्धनासाठी सर्व गावे सेंद्रिय करण्यासाठी मनुष्यबळाचा योग्यवापर करुन उपाय योजना करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन आर्टिफिशियल बिडिंग सेंटरची स्थापना करण्याची सूचना त्यांनी केली. शुध्द धान पक्ष्यांना मिळावे, यासाठी सेंद्रिय धान उत्पादनाला प्राधान्य देण्याची गरज आहे. यासाठी नाविन्यपूर्ण योजना तयार करुन जिल्हा नियोजन विकास निधीतून सहाय्य करण्याचा मानस ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
जगातील आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन दोन वर्षात सारस पक्षांची संख्या वाढावी, यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. बैठकीला वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, मुख्य वन संरक्षक रंगनाथ नाईकडे, जिल्हा परिषदेचे सीईओ अनिल पाटील आदी उपस्थित होते.