मुंबई:एकनाथ खडसे आणि संजय राऊत फोन टॅपिंग प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात खटला चालवण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. खटला चालवण्यास मागितलेली परवानगी गृह खात्याने नाकारलेली आहे. हा सर्व अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर ही केस बंद केली जाणार आहे.
शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहे. कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाला खटला चालवण्याकरिता परवानगी मागण्यात आली होती. केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. रश्मी शुक्लाविरोधात खटला चालवण्यास राज्य सरकारनेही नकार दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयात केंद्र सरकारची माहिती दोन नोव्हेंबर रोजी सत्र न्यायालय निर्णय देणार आहे.
प्रकरण नेमकं काय
अमली पदार्थ विक्रेत्यांच्या टोळीवर कारवाई करण्याचे कारण दाखवून तत्कालिन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिवांची कोणतीही परवानगी न घेता राजकीय नेत्यांचे दूरध्वनी अभिवेक्षण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात भारतीय तार अधिनियम कलम २६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या समितीने २०१५ ते २०१९ या कालावधीतील सर्व फोन टॅपिंग प्रकरणांची पडताळणी केली. पडताळणीत पुणे पोलीस आयुक्तालयाने २०१७ ते २०१८ या कालावधीत चार लोकप्रतिनिधींचे सहा मोबाइल क्रमांक टॅप केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.