वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
धुळे : जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी आमदार व भाजपाचे पूर्व प्रदेश संघटनमंत्री धरमचंद चोरडिया यांचे १० मार्च रोजी पुणे येथे आपल्या मुलाकडे आकस्मिक निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुणे येथेच १० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माजी आमदार धरमचंद चोरडिया हे १९७७ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता होते. १९७८-८१ या काळात ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस होती. १९८२ साली ते युवा मोर्चाचे राष्ट्रीय चिटणीस झाले. त्याकाळात त्यांनी राष्ट्रीयस्तरावर केलेल्या कामाची दखल घेत त्यांना भाजपात प्रदेश चिटणीसपद मिळाले. त्यानंतर ते प्रदेश संघटनमंत्री होते. नगरसेवक - धरमचंद चोरडिया १९८४ ते ९० याकाळात धुळे पालिकेचे सदस्य होते. त्यानंतर ते १९९२ साली जूनमध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली होती.
आणीबाणी आणि मराठवाडा नामांतर आंदोलनात कारावास - आणीबाणीच्या काळात त्यांनी १९ महिने कारावास भोगला होता. तसेच मराठवाडा नामांतर आंदोलनातही कारावास भोगला होता. ते जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपदावरही होते. विधान परिषदेचे आमदार असतांना १९९२ मध्ये त्यांचा जोधपूर येथे कौटुंबिक कार्यक्रमास गेले असतांना अपघात झाला होता. त्यानंतर ते सक्रीय राजकारणापासून लांब गेले होते. धुळ्यात माजी प्रधानमंत्री अटलबिहारी बाजपेयी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह जे जे नेते आले त्यांनी धरमचंद चोरडिया यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्रचे माजी प्रदेश संघटनमंत्री धरमचंद चोरडिया यांच्या निधनाने पक्षाने राष्ट्रीय विचारांसाठी समर्पित कार्यकर्ता गमावला आहे. धरमचंद चोरडिया हे लढाऊ वृत्तीचे कार्यकर्ते आणि कुशल संघटक होते, अशी श्रद्धांजली भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी अर्पण केली.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, धरमचंद चोरडिया यांनी तरूण वयातच भारतीय जनता पक्षच्या कार्याला वाहून घेतले. त्यांनी आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीच्या रक्षणासाठी केलेल्या आंदोलनामुळे कारावास भोगला. तसेच मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीतही कारावास सहन केला. भाजपाच्या युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रीय चिटणीस, प्रदेश संघटनमंत्री अशा संघटनात्मक पदांवर त्यांनी कुशलतेने काम केले. विधान परिषद सदस्य म्हणूनही त्यांची निवड झाली होती. भारतीय जनता पक्षच्या उभारणीच्या काळात पक्षाच्या आंदोलनांचे कौशल्याने संघटन करण्याबाबत त्यांची ख्याती होती. भाजपा, महाराष्ट्र त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.