मुंबई : पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर तिच्या फेसबूक पोस्टही आता पुन्हा चर्चेत येऊ लागल्या आहेत. पूजा चव्हाणचा राजकारणाशी आणि राजकीय वर्तूळाशी तसा जवळचा संबंध असल्याचे तिच्या फेसबूक पोस्टवरून निदर्शनास येते. तिने आपल्या फेसबूक पोस्टद्वारे 'हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ' या पुस्तकाचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर टीका केली होती.
तसेच दुसऱ्या एका फेसबूक पोस्टमध्ये पूजाने नाव न घेता व्यक्तीवर टीका केली आहे. त्यात ती म्हणते, "काही लोक कारण न सांगताच अबोला, गर्व, अहंकार, कपट, कारस्थान दुश्मनी धरतात, कारण काहींना सौंदर्याचा, मालमत्तेचा, पैशाचा, अधिकाराचा, राजकीय पदाचा व खोट्या प्रतिष्ठेचा गर्व असतो. परंतु ते आज असते व उद्या नसते हा निसर्गाचा नियम आहे, एकमेकांबरोबर सुसंवाद ठेवा व नाती जपा हे जीवन आज आहे आणि उद्या नाही."
दरम्यान, या प्रकरणी संजय राठोड यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात असल्याने राज्याच्या राजकारणात गदारोळ माजला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनमंत्री राठोड यांचा राजीनामा स्वीकारावा, अशी मागणी भाजपसह सर्व विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. राठोड मात्र, शक्तीप्रदर्शन करून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता विरोधकांनी संजय राठोड हे प्रकरण अधिवेशनात मुद्दा आणण्याची व्युहरचना केली आहे.